बहिरपूर येथील नवजात बालक दानिश पवन खर्डे (वय २ महिने) या बालकास प्राथमिक आरोग्य केंद्र आडगाव अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेविका प्रमिला वाघ आणि अंगणवाडी सेविका गंगा कैलास पवार यांनी बीसीजी, पेंटा एक, रोटा एक आणि पोलिओ असे एकत्रित एकाचवेळी लसीकरणाचे चार ओव्हर डोस दिल्यामुळे या बालकाची परिस्थिती अतिशय गंभीर बनली व दि. ७ रोजी हे बालक दगावले. ही बाब भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस जयश्री चव्हाण यांना समजली व त्यांनी ठाणे जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांना कळविली. महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सविता जयस्वाल, जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या, पंतप्रधान कल्याण योजना समिती अध्यक्षा सीमा सोनगिरे, सोशल मीडिया सदस्या भावना लोहार या प्राथमिक आरोग्य केंद्र आडगाव येथे या बालकाच्या पालकांना घेऊन गेल्या. आरोग्य अधिकारी आणि संबंधित आशा व अंगणवाडी सेविका यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, ही मागणी करण्यात आली. तसेच शहाद्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देऊन बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी शहादा तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST