नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती व पूर्णता: संचारबंदी बाबत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मोलगी व धडगाव येथे कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यानिमित्त नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्या फोल ठरल्या असून, कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्वसामान्यांसाठी मदतीची घोषणा करतील, असे वाटत होते. आरोग्य सुविधेत बदल होईल अशी अपेक्षा होती. जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये कोरोना उपाययोजनांसाठी डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल पण तसे काही झाले नाही.
यापूर्वी कोरोनाबाधित रूग्णांच्या परिसरात आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात होत्या. आता परिसर निर्जंतुकसुध्दा केला जात नाही. रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग केले जात नाही. रूग्णांच्या घरापर्यंत रूग्णवाहिकेची सुविधा केली जात नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर लाखों रूपयांचा खर्च होतो. परंतु कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची सुविधा होत नसल्याने महाआघाडी सरकार रूग्णांना वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे कोरोना मृत्युदर वाढल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला. तसेच जिल्ह्यात प्रशासनाने १ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. संचारबंदीमुळे व्यावसायिक, व्यापारी, हातावर पोट भरणारे, मजूर कामगार यांना आर्थिक झळ पोहचणार आहे. संचारबंदीला आमचा मुळीच विरोध नाही. पण, प्रशासनाने आर्थिक मदतीची तरतूद करावी, अशी मागणी आहे.