लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक तालुकास्तरावरील उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनी अद्ययावत बंदीस्त कक्ष स्थापन करावा. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी हे प्रत्येक तालुक्यात जावून याची खात्री करणार व जनजागृतीसाठी नियोजन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेवून उपाययोजनेविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.शिवाजी सुकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडखे आदी उपस्थित होते. उपाययोजना, घेण्यात येणारी काळजी यासह विविध बाबींची माहिती डॉ.भारूड यांनी यावेळी दिली. जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे.याशिवाय उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या रुग्णालयात व कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र अद्ययावत कक्ष स्थापन करावा. रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांची व्यवस्थीत तपासणी करावी व औषधोपचार करावा. जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या आदेशांचे पालन करावे. वरिष्ठांच्या परवाणगीशिवाय वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये.खाजगी डॉक्टर्स यांनी आपल्या रुग्णालयात बंदीस्त वॉर्ड तयार करावा. मास्क, व्हेंटीलेटर, आॅक्सीजन पुरेसे उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. एन ९५ तसेच सर्जीकल मास्क यांचा अनावश्यक वापर, साहित्य व औषध विक्री जास्त किंमतीने होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.जिल्हा रुग्णालयात सहा खाटांचा स्वतंत्र व अद्ययावत कक्ष करण्यात आलेला आहे. संशयीत रुग्णांचे घशातील नमुना घेण्यात येवून तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.हॉटेल्स, लॉजिंग धारकांनी परदेशातील नागरिक आल्यास व अशा प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात संदर्भीत करावे. त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले असल्यास तेथे निर्जंतूकीकरण करावे अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.याशिवाय जिल्ह्यातील ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये परदेशातील, परप्रांतातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तेथे विशेष काळजी घेण्याची सुचना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी दिली.
सौदी मधून आलेल्या तिघांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.यासंदर्भात अफवा पसरविणारे, गैरसमज निर्माण करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. सोशल मिडियावरही अतीरंजीत पोस्ट टाकू नये.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टिश्यू पेपर, नॅपकीन यांचा वापर, हात स्वच्छ धुण्याविषयी सुचना द्याव्या.विद्यार्थ्यांना भिती वाटेल अशा पद्धतीने कुठलीही कृती करू नये, जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा वापर करू नये.प्रत्येकाने शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अतीआवश्यक असेल तरच जावे परंतु योग्य काळजी घ्यावी.विनाकारण मास्क वापरण्याची गरज नाही. शिंकतांना, खोकतांना तोंडावर रुमाल वापरावा, हस्तांदोलन टाळावे. वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, मधुमेही रुग्ण यांनी विशेष काळजी घ्यावी.