जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काढलेल्या सुधारित आदेशात नाशवंत वस्तूंच्या विक्रीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत मुभा देण्यात आली. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत नागरिक या ना त्या निमित्ताने गावात फिरतच होते. परंतु एक वाजल्यानंतर मात्र ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दुपारपासून शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. शहरातील वेगवेगळ्या भागात फिरून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन पोलीस करीत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य कारणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच थांबावे. विनाकारण कायदा-सुव्यवस्था मोडू नये. कायदा सुव्यवस्था मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बुधवंत यांनी केले आहे.
दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यात गरीब-नवाज कॉलनी रस्ता, जुना प्रकाशा रस्ता व अन्य ठिकाणी बॅरिकेट्स लावले आहेत. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.