शहादा तालुक्यातील जयनगर येथे हेरंब गणेशाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी येथे अंगारकी चतुर्थीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह संपूर्ण खानदेश, मध्यप्रदेश, गुजरात येथील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. यानिमित्ताने ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी अंगारकी चतुर्थीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंडपाची व्यवस्था केली जात असते. तसेच दुकानदार, व्यावसायिकांनाही आपले दुकान लावण्यासाठी ट्रस्टच्यावतीने विशेष नियोजन केले जात असते. मात्र यात्रा रद्द झाल्याने दुकानदारांना सलग दुसऱ्या अंगारकीला आर्थिक फटकाला सामोरे जावे लागणार आहे.
जयनगर येथील हेरंब गणेशाचे मंदिर हेमाडपंथी असून अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे. त्यामुळे भाविकांमध्ये या देवस्थानाचे विशेष महत्त्व आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात वर्षभर दर्शनासाठी गर्दी असते. मात्र आता कोरोनाच्या महामारीत मंदिरे बंद असल्याने भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असून पहिली अंगारकी चतुर्थीचा योग २ मार्च रोजी होता. मात्र त्यावेळेसही कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रभावामुळे प्रशासनाने यात्रा रद्दचे आदेश दिले होते. तेव्हापासून मंदिरे बंदच असून आता तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे अजूनही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही.
सलग एकाच वर्षात दोन अंगारकी चतुर्थीचा योग आला असला तरी सलग दुसरी अंगारकीलाही यात्रा रद्द तसेच मंदिर बंद राहील, असे ट्रस्टच्यावतीने जाहीर करण्यात आल्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला आहे. शिवाय ज्या भाविकांना अंगारकी चतुर्थीला नवस फेडायचा असतो त्यांना यावर्षी सलग दुसऱ्यांदा नवस फेडण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. श्री.हेरंब गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी व विश्वस्त मंडळाकडून अंगारकी चतुर्थीला होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.