तळोदा : येथे सर्वच रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली असून, पिकांना खताची मात्रा देताना शेतकऱ्यांची दमछाक वाढली आहे. खत उत्पादक खतांच्या दर निश्चितीची वाट पाहत असल्यामुळे रॅक लागत नसल्याचे म्हटले जात आहे. तथापि, प्रशासनाने याप्रकरणी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या दहा, बारा दिवसांपासून रासायनिक खते मिळत नसल्याचा तक्रारी आहेत. त्यातही युरियाबरोबरच सुपर फॉस्फेट, डी. ए. पी. अशी पिकांसाठी पोषक असलेली व वाढ करणारी प्रमुख खते तळोदा शहरातील विक्रेत्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे पिकांना मात्रा देता येत नाही. शेतकरी या खतांसाठी नंदुरबार, शहदा, कुकरमुंदा येथे जात आहेत. परंतु, तरीही खते मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. खतांची मात्रा पिकांना मिळत नसल्यामुळे त्यांची वाढ खुंटली आहे. साहजिकच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तळोदा तालुक्यात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे केळी, पपई, ऊस, आदी नगदी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वास्तविक खरीप हंगाम अतिपर्जन्यवृष्टीने हातचा गेला होता.
साहजिकच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. असे असताना शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने नगदी पिके लावली. मात्र, रासायनिक खतांच्या मात्रेअभावीही पिके तग धरून उभी आहेत. गेल्या बारा दिवसांपासून खतांची टंचाई निर्माण झाली असताना ती तातडीने उपलब्ध करून देण्याची अपेक्षा असताना प्रशासनानेही हात झटकल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खतांच्या टंचाईप्रकरणी येथील कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता, खतांचे दर निश्चित झाले नसल्यामुळे रॅक लागत नसल्याचे सांगण्यात आले. तरीही दोन, तीन दिवसात खत येणार असल्याचे सांगितले. आधीच ग्रामीण भागात दहा-बारा तासांचे भारनियमनाव्यतिरिक्त विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे कसेबसे पाण्याचे नियोजन करून शेतकरी आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न करून वाढवत असतो. मात्र, रासायनिक खतांच्या टंचाईने पिकांची परिस्थिती नाजूक बनल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
चौकट.
गोणीमागे २०० रुपये अधिक. खतांची टंचाई लक्षात घेऊन ज्या व्यावसायिकांकडे खत शिल्लक आहे, असे व्यावसायिक खताच्या गोणीमागे १५० ते २०० रुपये अधिक आकारात असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे तालुका कृषी प्रशासनाने अशांची चौकशी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
कोट...
मोठ्या मेहनतीने पाण्याचे योग्य नियोजन करून ऊसाचे पीक वाढवले आहे. आता त्याला खताची मात्रा द्यायची आहे. परंतु, दहा-बारा दिवसांपासून सर्वच खते मिळत नसल्यामुळे पिकाची वाढ थांबली आहे. प्रशासनाने खत तातडीने उपलब्ध करावे.
- धनराज कदम, शेतकरी, रांजणी तळोदा.
कोट...
वरिष्ठ पातळीवरच रासायनिक खतांच्या पुरवठा होत नाही. येत्या दोन दिवसात रॅक लागणार आहे.
- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, तळोदा