लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्या मानाने उपचारांसाठी जिल्ह्यात सुविधा नसल्याने केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल व केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून खास रेल्वे कोविड कोच नंदुरबारसाठी मिळाला आहे. या रेल्वेत एकूण ३१ कोच असून, त्यात किमान ६०० रुग्णांना उपचार देता येणार आहे. रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे नियोजन व खबरदारी म्हणून या ठिकाणी फक्त पुरुष रुग्णांनाच उपचारांसाठी ठेवण्यात येणार आहे. या रेल्वेमुळे इतर रुग्णालयातील आरोग्याचा ताण कमी होणार असल्याची माहिती खासदार डाॅ. हिना गावित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या रेल्वे कोचमध्ये उपचारांच्या कुठल्या सुविधा राहणार आहेत?
नंदुरबार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर ही रेल्वे असून, त्यातील तापमान नियंत्रित व्हावे यासाठी डेझर्ट कुलर्स, तसेच रेल्वेच्या टपावर गोणपाट टाकण्यात आले आहेत. याशिवाय येथे मंडपही उभारण्यात आला आहे. प्रत्येक कोचमध्ये २२ बेड आहेत. त्या ठिकाणी कुलर्स, ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णांसाठी बाथरूम व इतर सुविधा आहेत. प्रत्येक कोचमध्ये रुग्णांना उपचारांसाठी डाॅक्टर व नर्सेसही नियुक्त करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी रुग्णांना उपचार देण्याकरिता अक्कलकुवा येथील युनानी मेडिकल काॅलेजमधील २२ डॅाक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नर्स व आरोग्यसेवक राहणार आहेत. प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार येथे करण्यात येईल. सद्या जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत या रेल्वेत साधारणत: ६०० रुग्णांना उपचार घेता येईल. कमी व मध्यम लक्षण असणाऱ्या रुग्णांवर येथे उपचार होईल. आवश्यकता भासल्यास या ठिकाणी ऑक्सिजनचीही सुविधा राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भीती नको, वेळीच निदान करून उपचार घ्या
सद्या कोरोनामुळे मृत्यूची संख्या ही वाढत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वास्तविक, बहुतांश लोक लक्षणे दिसल्यानंतर तपासणी करीत नाहीत. घरगुती उपचार करतात व जेव्हा आजार वाढतो तेव्हा तपासणी करतात. अशा रुग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शनची आवश्यकता भासते आणि धावपळ करतात. ही वेळ येऊ नये यासाठी जेव्हा प्राथमिक लक्षणे दिसतात तेव्हाच लोकांनी स्वॅब तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात सद्या असे वातावरण आहे. त्यामुळे आपण खास बोलीभाषेत व्हिडिओ करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी उपक्रम सुरू केला आहे. आता प्रत्येक आरोग्य केंद्रात उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे दिसताच तपासणी करा, निश्चित बरे होणार. मनात कुठलीही भीती बाळगू नका. ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांचे प्रमाणही वाढले असल्याने त्यांच्याकडे न जाता आरोग्य केंद्रातील अथवा तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्या, असे आवाहनही डाॅ. हिना गावीत यांनी केेले.