लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनेक प्रश्नांवर मोठ्या मोठ्या अभ्यासकांना व संशोधकांना पर्याय सापडत नाही, पण काही वेळा ग्रामीण भागातील जुगाडदेखील अनेक समस्यांवर पर्याय ठरत असतात. असाच ग्रामीण जुगाड सातपुड्यातील हातपंपांवर तेथील आदिवासींनी केला आहे. त्यामुळे या हातपंपांचे आयुष्य तर वाढलेच पण त्याचा वापरही सुलभ झाला आहे.सातपुड्यात बहुतांश गावात पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप बसविण्यात आले आहेत. पाण्याची खोली जास्त असल्याने हातपंपावर खूप शक्ती वाया घालवावी लागते. अनेक वेळा या हातपंपाचा दांडा वरून तर खालपर्यंत जोर जोरात वर खाली करावा लागतो. त्यामुळे हातपंपाच्या दांड्याखालील स्प्रींग तुटतो व हातपंप निकामी होतो. शिवाय हातपंप ओढणाऱ्यांनाही इजा होते. त्यावर पर्याय म्हणून या भागातील आदिवासींनी हातपंपाला निकामी झालेले टायर बांधले आहेत. हा टायर दोर व तेथे दगड ठेवून फिट केला जातो. त्यामुळे हातपंपाचा दांडा ठराविक मर्यादेपर्यंतच ओढता येतो. त्यामुळे स्प्रींगवर ताण पडत नाही. शिवाय कमी अधिक वेगात हातपंप ओढला गेल्याने इजाही होत नाही. सध्या सातपुड्यातील अनेक गावात असा प्रयोग अर्थात ग्रामीण जुगाड केलेला दिसून येतो. एकीकडे शाहू भागात शासनाने पुरविलेल्या भौतिक सुविधांच्या वापराबाबत निष्काळजी व बेपर्वाही दिसून येत असतांना आदिवासी भागात मात्र शासनाच्या योजना दिर्घकाळ टिकाव्यात यासाठी आपलेपणाच्या भावनेतून केलेला हा प्रयोग कुतूहलाचा व चर्चेचा ठरत आहे.
हातपंपचे आयुष्य वाढविणारे ‘सातपुडा पॅटर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:22 IST