लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे बाधितांच्या संपर्कातील पुन्हा नऊ लोकांचा अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आल्यानंतर गावात आता रूग्णांची संख्याही १२ झाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात एकाच वेळी एवढे रूग्ण निघाल्याची ही पहिलीच वेळ आहे व त्यांच्या संपर्कातील आठ लोकांना क्वॉरंटाईन करून विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.गावातील बाधित रूग्णांचा परिसर व ग्रामपंचायत चौक प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेटींग करण्यात आले असून, गावात दुसऱ्यांदा निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले असून, गाव निर्मनुष्य झाले आहे. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, घाबरून जाऊ नये, असे आव्हान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले आहे.सारंगखेडा येथे गेल्या आठवड्यात बाधिताचा इंदूर येथे पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत ३२ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी २५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. दुसºया दिवशी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर आता नऊ लोकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, गावात आरोग्य विभागातर्फे फेर सर्वेक्षण करण्यात येत आहे. ग्रामपंचायततर्फे परत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. बाधित रूग्ण परिसर व ग्रामपंचायत चौक हा बॅरिकेटींग करून सील करण्यात आलेला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, असे आवाहन करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रूग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनास साखळी तोडण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी शासनाचे नियम पाळून कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
सारंगखेडा येथे पुन्हा नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 12:59 PM