शहरातील जुनी पालिका परिसरातील मंगळबाजार,शास्त्री मार्कट, अंधारे स्टॅाप नेहरू चौक, हाटदरवाजा या मुख्य रस्त्यावर वाहनधारकांकडून वाहतूक नियमावलीचे उल्लघंन होत आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी संदेश व जनजागृती करण्यात येत असतानाही वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. दुचाकी,चारचाकी वाहनधारक बेदरकारपणे वाहने चालवत आहे. धावत्या वाहनावर मोबाइलवर बोेलणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहेत. शाळा-महाविद्यालयातील मार्गावर भरधाव वाहने चालवणारे रोडरोमियो बेफिकिरीने दुचाकी चालवताना दिसून येत आहे. अवैध प्रवासी वाहतूक, लायसन्स न हाताळणे,नो पार्किंगमध्ये गाडी पार्किंग करणे, इंग्रजी,मराठी फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा वापरणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे आदी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते, पंरतु वाहनधारक यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. वाहतूक पोलिसांनी सुरक्षा सप्ताहात दंड आकारणी करूनदेखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.
दरवर्षी शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान जिल्हाभरात राबविण्यात येते. वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व त्याविषयीच्या नियमांची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मुख्य रस्ते व शाळा महाविद्यालय पोलीस प्रशासनातर्फे अभियान राबविण्यात येते. मात्र वाहनधारकांमध्ये अभियान नंतरही जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. तसेच ग्रामीण भागातून शहरात खासगी वाहतूक करणारे वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत. प्रशासनाच्या रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येऊनही सुधारणा होत नसल्याने सर्वसामान्यामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.