प्रकाशा ते नांदर्डे हा रस्ता पुढे करणखेडा, सोनवल, वैजाली, मोड आदी गावांकडे जातो. याच रस्त्यावर प्रकाशा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. रोज सकाळी मजुरांना शेतात ने-आण करणे, शेतमालाची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करावी लागते. मात्र रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने मोठी अडचण येत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र दुर्लक्ष होत असल्याने प्रकाशा येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. या रस्त्यावर जागोजागी खड्डेही पडले आहेत.
दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरून उसाचे ट्रॅक्टर येत असताना उलटून अपघात झाला. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता संबंधित विभागाने तत्काळ दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे तोडून येथील रस्ता रुंद करावा व रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी प्रकाशा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.