गेल्या चार महिन्यांपासून थंडावल्या. कोरोना या महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या आठवड्यापासून तर अतिशय गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनदेखील सर्व शक्तीनिशी सुसज्ज झाले आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभासारख्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर वॉच ठेवण्यासाठी स्थानिक महसूल, पोलीस व पालिका प्रशासनास सक्त ताकीद दिली आहे. कारण याच ठिकाणी अजूनही नागरिक गांभीर्याने घ्यायला तयार नाही. कोरोना महामारीची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन तळोद्याचे तहसीलदार गिरीश वाखारे, पोलीस निरीक्षक नंदलाल पाटील, नायब तहसीलदार शैलेश गवते, नायब तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे यांनी शहरातील पालिकेच्या मालकीच्या भगवान नगरमधील आदिवासी सांस्कृतिक भवन व गोपाळ नगर मधील समाज मंदिर या दोन ठिकाणी सुरू असलेल्या लग्न समारंभात थेट धाड टाकली. शासनाने ठरवून दिलेल्या ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने वर-वधूच्या पालकांवर दंडात्मक कारवाई केली. वधू पालक रवींद्र बाबुराव पाटील, रा.चिनोदा व वर पालक दिनेश सुभाष चव्हाण रा.तळोदा यांच्याकडून प्रत्येकी १० हजार असे एकूण २० हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. जेव्हा यंत्रणांचा हा ताफा लग्नस्थळी दाखल झाला होता तेव्हा वऱ्हाडींची चांगलीच घबराट पसरली होती. महसूल प्रशासनाने उघडलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. परंतु यात सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कारवाईचे कडक निर्देश
तळोदा शहाराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये, म्हणून उपाययोजनांबाबत येथील उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली होती. विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई करा, शिवाय लग्न व वेगवेगळ्या समारंभांवरही वाॅच ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची सूचना दिली. त्याचबरोबर लग्न समारंभासाठी ५० पेक्षा अधिक नागरिक राहणार नाहीत याबाबत संबंधितांना सूचित करूनच परवानगी द्यावी, अशा वेगवेगळ्या सूचना दिल्या. या बैठकीस तहसीलदार गिरीश वाखारे, पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, विस्तार अधिकारी आ.के. जाधव, पालिकेचे राजेंद्र माळी, नायब तहसीदार शैलेश गवते आदी उपस्थित होते.