मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाची जिल्हा परिषद निवडणूक अनेक अर्थांनी आणि घडामोडींनी गाजत आहे. अद्याप अंतिम चित्र स्पष्ट झाले नसले तरी यंदा आपल्या मुलांसाठी आणि पत्नीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. काही नेते आपल्या मुुलांची राजकीय कारकिर्द या निवडणुकीतून सुरू करीत आहेत तर काहीजण पर्याय म्हणून आपल्या घरातील व्यक्तीला उमेदवारीसाठी पुढे करीत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सोमवारी सायंकाळी निवडणुकीचे प्राथमिक चित्र स्पष्ट होणार असले तरी माघारीपर्यंत काय घडामोडी घडतात त्यावर निवडणुकीतील राजकीय पक्षांचे यशापयश अवलंबून राहणार आहे. परंतु यंदाची निवडणूक ही खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांच्या कस काढणारी राहणार असल्याचे स्पष्टच आहे. आपली मुलं, पत्नी यांना उमेदवारी देवून नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची तेव्हढीच चुरशीची करून ठेवली आहे.मुलांची राजकीय कारकिर्दया निवडणुकीच्या माध्यमातून काही राजकीय नेते आपल्या मुलांची राजकीय कारकिर्दचा श्रीगणेशा करीत आहेत. यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अॅड.राम रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या अॅड.सिमा वळवी, माजी आमदार शरद गावीत यांची कन्या अर्चना गावीत यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल.अॅड.राम रघुवंशी हे शिवसेनेतर्फे कोपर्ली गटातून निवडणूक लढविणार आहे. त्यांचे वडील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे देखील जिल्हा परिषदेतून निवडून जात थेट अध्यक्ष बनले होते. माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या अॅड.सिमा वळवी या अमोनी गटातून आपल्या राजकीय किरकीर्दला सुरुवात करीत आहेत.माजी आमदार शरद गावीत यांची कन्या अर्चना गावीत या यापूर्वी पंचायत समितीमधून निवडून आल्या आहेत, सभापतीही राहिल्या आहेत. आता त्या जिल्हा परिषदेत पाऊल ठेवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र अभिजीत पाटील हे देखील दुसऱ्यांदा रिंगणात उतरत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांच्या राजकीय कारकिर्दचा शुभारंभ झालेला आहेच.पत्नीसाठी नेते असलेले पती आघाडीवरया निवडणुकीत अनेक नेत्यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी देत निवडणुकीत उतरविले आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी आणि खासदार डॉ.हिना गावीत यांच्या आई कुमुदिनी गावीत या पुन्हा तिसºयांदा निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी त्या पाच वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. गेल्या निवडणुकीत देखील त्या निवडून आल्या होत्या. परंतु विरोधात बसावे लागले होते. आता त्या पुन्हा कोठली गटातून निवडणूक लढविणार आहेत.सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष दीपक पाटील यांच्या पत्नी कंचनबेन पाटील या देखील दुसºयांदा नशीब अजमावणार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यंदा त्या लोणखेडा गटातून भाग्य अजमावणार आहेत.आमदार शिरिष नाईक यांनी यावेळी त्यांच्या पत्नीऐवजी त्यांचे लहान बंधू व बाजार समितीचे सभापती मधुकर उर्फ दिपक नाईक यांना भरडू गटातून तर दुसरे बंधू शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अजीत नाईक हे उमराण गटातून उमेदवारी देणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकिल पाटील यांच्या पत्नी या देखील रनाळे गटातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वकिल पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्य पदाच्या कारकिर्दीत जिल्हा परिषद गाजविली आहे.जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्या पत्नी संगिता गावीत यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्या तिसºयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.जि.प.चे माजी सभापती विक्रमसिंग वळवी यांच्या पत्नी दिपमाला वळवी यांचीही उमेदवारी धानोरा गटातून निश्चित आहे. माजी सदस्य किरसिंग वसावे यांच्या पत्नी बाजूबाई वसावे या भांग्रापाणी गटातून, राष्टÑवादीचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्या पत्नी रेखा तांबोळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.पत्नी व मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणारे अनेक नेते हे जिल्ह्यातील राजकारणातील किंगमेकर आहेत. ऐनवेळी राजकीय समिकरणे बदलण्याची क्षमता या नेत्यांमध्ये असल्यामुळे नेत्यांची मुलं किंवा पत्नी या जिल्हा परिषदेत पदाधिकारी पदाच्या प्रमुख दावेदार राहणार आहेत. अर्थात सत्ता कुणाची येते यावर ते अवलंबून राहणार आहे. असे असले तरी सामान्य कार्यकर्ता या सर्वांमध्ये मात्र उपेक्षीतच राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहेच.
पत्नी व मुलांसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:29 IST