नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत सुरू असलेली बदली प्रक्रिया दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. बुधवारी शेवटचा दिवस असून, आता केवळ आरोग्य विभागांतर्गत बदल्या बाकी आहेत.
शासनाच्या १५ टक्के बदल्यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेअंतर्गत बदल्या केल्या जात आहेत. पहिल्या दिवशी सहा विभागांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी पाच विभागांच्या बदल्या करण्यात आल्या. बुधवारी केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. बदल्यांसाठीचे समुपदेशन शिबिर घेण्यात येत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना समुपदेशन शिबिरात बोलावून त्यांना पसंतीक्रम व ठिकाण विचारले जाऊन त्यानुसार रिक्त जागांवर बदली केली जात आहे. बुधवारी या प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, शासनाने ऐन पावसाळ्यात बदली प्रक्रिया राबविल्याने काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.