लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या २० दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेस येथील पालिकेने सोमवारपासून सुरूवात केली आहे. शहरातील बसस्थानक मार्गावरील भाजीपाला मंडई व परिसरातील साधारण ५५ कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली आहे. याच रस्त्यावरील एक पक्के अतिक्रमणदेखील पालिकेने जमीनदोस्त केले आहे. दरम्यान, मोहिमेपूर्वीच बहुसंख्य अतिक्रमणधारकांनी पालिकेच्या नोटीसा मिळाल्यानंतर स्वत:हून अतिक्रमण काढली आहेत.शहरात पुढे आलेल्या अतिक्रमणामुळे सातत्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असते. त्याच बरोबर या वाढत्या अतिक्रमणाने शहरास अक्षरश: भकास स्वरूप आले होते. या पार्श्वभूमिवर वरिष्ठ प्रशासनाच्या आदेशानुसार पालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला होता.यासाठी प्रशासनाने प्रमुख बाजार पेठ, स्मारक चौक, समाधान चौक, भाजीपाला बाजारपेठ, कॉलेज रस्ता, बसस्थानक, मेनरोड अशा वेगवेगळ्या भागात जावून प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार साधारण २७६ अतिक्रमणे पुढे आल्याचे पालिकेला आढळून आले होते. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिका प्रशासनाने संबंधीत दुकान मालकांना नोटीसा बजावून आठवडा भराच्या अल्टीमेटम् दिला होता. साहजिकच बहुसंख्य अतिक्रमणधारकाननी स्वत:हून आपले कच्चे उभे केलेले शेड्स काढली होती. साहजिकच पालिकेची ही अतिक्रमण मोहीम गेल्या १५ ते २० दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चेत राहिली होती. अखेर पालिकेने सोमवारी ही अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेची सुरूवात बसस्थानक परिसरापासून करण्यात येवून भाजी मंडई व परिसरातील साधारण ५० ते ६० अतिक्रमीत दुकाने काढण्यात आली आहे. याच पालिकेच्या डी.पी. रोडवरील गटारीवर उभे करण्यात आलेले पक्के अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. मात्र याच रस्त्यावर नेहमी उभे करण्यात येत असलेल्या ट्रक टर्मीनललादेखील पालिकेने कडक ताकीद द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. येथे वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.पालिकेची अतिक्रमण मोहीम पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. सोमवारी पालिकेने कच्चे शेड्स काढली. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा पक्के अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याचा पालिकेचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. शहरवासीयांमध्ये नेमक्या याच अतिक्रमणाबाबत उत्सुकता असून, पालिकेने कुठलाही दुजाभाव न करता त्याप्रकरणी ठोस भूमिका घेण्याची नागरिकांची अपेक्षा आहे. याशिवाय काढलेले ते अतिक्रमण पुन्हा उभे राहू नये याचीही दक्षता पालिकेने घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावे, बांधकाम अभियंता शंकर गावीत, दिगंबर माळी आदी कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून अतिक्रमण काढण्याबाबत मेहनत घेत होते. दरम्यान मंगळवारपासून बसस्थानक रोडकडील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
तळोद्यात ५५ कच्ची अतिक्रमणे काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:57 IST