नवापूर तालुक्यातील पाच ते सहा गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्यासाठी काही भागात महिलांना भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचीही परिस्थिती अवघड आहे. पशुधन कसे वाचवावे, हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. दैनंदिन वापरासाठी मोठी अडचण भासू लागली आहे. बागायती भागातील विहिरी, विंधन विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. जिरायती भागात पाण्याची अडचण आहे. नवापूर तालुक्यातील अनेक गावातील पीकही करपू लागले आहे. खैरवे धरणातून पाणी सोडल्याने अनेक विहिरी बोअरवेल हातपंप यांचा पाणीसाठा वाढतो. आदिवासी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळतो.
या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून खैरवे धरणातून ताबडतोब पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे व नागरिकांना पिण्याचे पाणी तत्काळ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्काळ निर्णय घेऊन पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करावे
खैरवे धरणातून ताबडतोब पाणी सोडावे शेतकरी, ग्रामस्थ, महिला पाण्यापासून वंचित आहेत. गुराढोरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवापूर तालुक्यातील देवमोगरा, निजामपूर, पालीपाडा, शेही शेती, बहुतांश गावे ही खैरवे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. धरणातून पाणी सोडावे, यासाठी दरवर्षी निवेदन द्यावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पाहून तत्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करावे.
- महेंद्र वळवी, सामाजिक कार्यकर्ते, शेही