नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सव्वातीन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:05+5:302021-05-09T04:31:05+5:30
तळोदा : कोरोना महामारीत शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार ५०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांचाकडून सव्वातीन ...
तळोदा : कोरोना महामारीत शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार ५०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांचाकडून सव्वातीन लाखांच्या दंड वसूल केला आहे. ही कारवाई त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात सुरू झालेली आहे. या लाटेने अत्यंत अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. यात रुग्णांचा मृत्यूदरदेखील चांगलाच वाढला आहे. साहजिकच यामुळे शासनास लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू करावे लागले आहे. कारण समाजातील ब्रेक द चेन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सामाजिक ‘दो गज की दूरी मास्क है जरूरी’ अशा नियमाचे पालन करण्याचं बंधन म्हणजे सक्ती नागरिकांना घालण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांना कडक अंमलबजावणी करण्याची सूचना वरिष्ठांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा आदेशानुसार तळोदा पोलीसदेखील अशा बेजबाबदारांवर कारवाईसाठी सक्रिय झाले आहेत. याकरिता त्यांनी भरारी पथक नियुक्त केले आहे. दिवसभर हे पथक बिगर मास्क व सामाजिक दुरीचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर वाॅच ठेवत असते. गेल्या जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत म्हणजे चार महिन्यांत तब्बल तीन हजार ६३३ जणांवर केसेस दाखल करून त्यांचाकडून तीन लाख २७ हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मार्च व एप्रिल महिन्यात तब्बल एक हजार ३०५ जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख ६१ हजार रुपये वसूल केले आहेत. कोरोना महामारीमुळे पोलिसांनी उघडलेल्या या मोहीम बाबत विनामास्क फिरणाऱ्यांवर वचक बसलेला आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच तोंडावर मास्क दिसून येतो. शासनाच्या या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, फौजदार अभय मोरे, फौजदार अविनाश केदार, पो. काॅ. अजय पवार, युवराज चव्हाण, अजय कोळी, अनिल वळवी, विलास पाटील, उमेश चौधरी व इतर कर्मचारी धडक कारवाई करीत आहेत. असे असले तरी या पथकाने शहरात प्रचंड होणाऱ्या गर्दीवर देखील नियंत्रण आणण्याची अपेक्षा आहे. शुक्रवार या बाजाराचा दिवशी गर्दी होणे समजू शकतो. मात्र, जनता कर्फ्यू वगळता इतर दिवशी कायम गर्दी होते. विशेष म्हणजे बँकांच्या ठिकाणी तर सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडत असल्याचे चित्र दररोज पहावयास मिळते. याला बँक प्रशासनदेखील वेसण घालत नसल्याचा आरोप आहे. पोलीस, महसूल प्रशासनाने अशा गर्दीला आवर घालण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी आहे.
याशिवाय भाजीपाला व किरकोळ फळ विक्रेते यांना चिनोद्या रस्त्यावर एका मोकळ्या जागेवर दुकानं थाटण्याकरिता मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे; परंतु अजूनही अनेक व्यावसायिक शहरातील मेन रोड, मारुती मंदिर, बसस्थानक रोडवर व्यवसाय थाटत असल्याचे चित्र आहे. प्रशासन आणि पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनदेखील ते तेथून उठायला तयार नाहीत. नगरपालिका म्हणते, व्यावसायिक आमचं ऐकायला तयार नाहीत, तर महसूल व पोलीस पालिकेला कारवाई करायच्या सूचना देतात. या तिन्ही यंत्रणांच्या मै-मैं, तू-तू मुळे व्यावसायिक शिरजोर झाले आहेत. त्यांचे प्रशासन काहीच बिघडवत नसल्यामुळे आमच्या बाबतीतच दुजाभाव का केला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.