नंदुरबार : शहरातील बाजारात गेल्या आठ दिवसात लसूणची आवक वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. गावरान लसूण १५० रूपये, मोठी लसूण ५० ते ८० रूपये किलो दराने बाजारात उपलब्ध झाली आहे. लसूणचे दर कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी स्वत: बाजारात लसूणची विक्री करत आहेत.
मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज
नंदुरबार : शहरालगतच्या ग्रामीण हद्दीतील वसाहतींमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यातून किरकोळ अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देत जनावरांच्या मालकांना समज देण्याची मागणी होत आहे.
वाहतूकदारांना मार्गदर्शन करावे
नंदुरबार : जळगाव जिल्ह्यात पपईचा ट्रक उलटून १५ जण ठार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, जानेवारी महिन्यात तोरणमाळ येथेही भीषण अपघात झाला होता. या अपघातातही सहा मजुरांचा बळी गेला होता. बेशिस्त वाहतुकीमुळे हे अपघात झाल्याचे समोर आले होते. जिल्ह्यात अद्यापही मजुरांची बेशिस्तपणे वाहतूक होत असल्याने वाहतूकदारांना योग्य शिस्त लावण्याची मागणी होत आहे.
खर्डी नदी पुलावर कठड्यांची मागणी
तळोदा : शहरातील खर्डी नदीच्या पुलावर कठडे नसल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. याठिकाणी कठडे उभारण्याची मागणी अनेकदा करुनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाने पुलावर चांगल्या दर्जाचे कठडे उभारण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.
कोळद्यापर्यंतचे खड्डे ठरताहेत त्रासदायक
नंदुरबार : नंदुरबार ते कोळदा या दरम्यान पडलेले खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. हे खड्डे बुजविण्याची सातत्याने मागणी करुनही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे. कोळदा गावापर्यंत काही ठिकाणी खड्डे बुजविले आहेत तर काही ठिकाणी खड्डे ‘जैसे थे’च आहेत.
वाहतूक कोंडीमुळे वाढतात अडचणी
नंदुरबार : शहरातील सोनार खुंटावर सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास याठिकाणी पादचाऱ्यांनाही चालण्यास जागा उरत नाही. याकडे वाहतूक शाखेने गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या मार्गावर दररोज सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होते.