लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये ११ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारी सुरू करण्यात आली. परंतु विद्यापीठाने स्वीकारलेले ५० टक्के क्षमतेचे धोरण आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे पहिल्या दिवशी महाविद्यालयांमध्ये तुरळक अशी विद्यार्थी संख्या दिसून आली. नंदूरबार जिल्ह्यात कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या अखत्यारितील एकूण ४३ महाविद्यालये आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान सोबत शिक्षणशास्त्र, औषध निर्माणशास्त्र यासह विविध विद्याशाखांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी ही महाविद्यालये २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर बंद करण्यात आली होती. २२ मार्च २०२० नंतर महाविद्यालयांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेत ऑनलाईन निकाल लावण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया ही १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थी ११ महिन्यांपासून महाविद्यालयांपासून दुरावले होते. यामुळे दरदिवशी गजबजणारी महाविद्यालये अक्षरश भकास झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली होती. विविध उपाययोजनांचा आधार घेत महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले होते. दरम्यान, विद्यापीठानेही दर दिवशी प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना आलटून-पालटून बोलावण्याचे महाविद्यालयांना सूचित केले होते. यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी महाविद्यालये गजबजतील असा अंदाज होता. परंतु पहिल्या दिवशी नंदुरबार शहारातील चार प्रमुख तर जिल्ह्यातील विविध ३९ महाविद्यालयांमध्ये तुरळक संख्येने विद्यार्थी आले होते. येत्या काळात एसटी बस पासेस तसेच वसतीगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालयात ७० टक्के विद्यार्थी बाहेरुन येतात.
१८ हजार विद्यार्थी n नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ४३ महाविद्यालयात एकूण १८ हजार ३५० विद्यार्थी यंदा विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी येणार नसले तरी निम्मे विद्यार्थी येण्याची शक्यता होती. यामुळे महाविद्यालयांकडून प्रवेशद्वारावर मास्क, सॅनेटायझर्स आणि थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली होती. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून आत सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ताप किंवा इतर तत्सम लक्षणे असलेले विद्यार्थी आढळून आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले.