नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात काही ठराविक घराण्यांचा प्रभाव आहे. त्यात दोन महत्त्वाची घराणी म्हणजे रघुवंशी आणि गावीत घराणे. अर्थातच नंदुरबार जिल्ह्याच्या मुख्यालयी या दोघांचा प्रभाव असल्याने सातत्याने जिल्ह्याच्या राजकारणात हे दोन्ही घराणे चर्चेत राहिले आहेत. तब्बल अडीच दशके एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन्ही घराणे गेल्या विधानसभा निवडणुकीत एकत्र आल्याने जिल्ह्यातील जनतेलाही विकासाचे नवे स्वप्न पडू लागले होते. नव्हे तर ज्येष्ठ नेते आ. डॉ. विजयकुमार गावीत व चंद्रकांत रघुवंशी या दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकाच व्यासपीठावर येऊन आपण एकत्र आल्याने आता जिल्ह्याच्या विकासाचा वेग सुसाट होईल, असे जाहीर वक्तव्यही केले होते; पण राजकारणात कधी काय घडेल, हे सांगणे कठीण असते. नेमका तोच अनुभव जिल्ह्यातील जनतेला सध्या येत आहे. दीड वर्षापूर्वी एकत्र येऊन विकासाचे स्वप्न दाखवणारे हे दोन्ही नेते सध्या एकमेकांच्या विरोधात आग ओकल्यागत आरोप करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या पुन्हा नेहमीप्रमाणेच दोन दिशा राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून सध्या जिल्ह्यातील राजकारणात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. विजयकुमार गावीत यांचा राजकारणात अचानक प्रवेश झाला आणि तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. कारण पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून त्यांना दोन-अडीच वर्षांतच राज्यमंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते. अर्थात त्यांच्या राजकारणाची सुरुवातच रघुवंशी घराण्याच्या विरोधापासून झाली. त्यामुळे साहजिकच रघुवंशी आणि गावीत घराणे एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणूनच राहिले. हा विरोध इतका टोकाचा होता की, राज्यात आघाडीचे सरकार असतानाही हे दोन्ही नेते आघाडीच्या पक्षात राहूनही त्यांच्या राजकीय वैमनस्याचे पडसाद सातत्याने जिल्ह्याच्या राजकारणात उमटत होते. या दोन्ही नेत्यांच्या राजकीय विरोधामुळे जिल्ह्याच्या विकास कामावरही परिणाम होत असल्याचे लोकांमध्ये बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतराच्या लाटेत चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांची भाषा युतीची सुरू झाली. निवडणुकीतही भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावीत हेच असल्याने दोघांचे सूर जुळू लागले. राजकीय बैठका आणि सभांमधून ते एकत्र येऊन एकीची भाषा बोलू लागले. रनाळे, ता. नंदुरबार येथील प्रचारसभेत तर या दोघांनी आम्ही एकत्र आल्याने आता जिल्ह्याच्या विकासाचा वेग सुसाट होईल, असे आश्वासनही दिले होते. पुढे राज्यातील राजकारणाचे समीकरण बदलले. सत्ता स्थापन करताना युती तुटली; पण या दोन्ही घराण्यांतील समन्वय मात्र काही दिवस बऱ्यापैकी टिकून होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही एकमेकांची भूमिका सौम्यच राहिली होती. त्यानंतर जि.प.तील भिंत तोडण्याच्या प्रकरणावरून एकमेकांच्या विरोधातील राजकीय ठिणगी पडली; पण ती तेवढ्याच लवकर शमली होती. या दोन्ही घराण्यांतील समन्वयाचा सूर जुळत असताना गेल्या महिन्यात रेमडेसिविर इंजेक्शन व जिल्हाधिकारी यांच्या मुद्यातून या दोन्ही घराण्यांतील वैमनस्य अचानकपणे चव्हाट्यावर आले. फेसबुक लाइव्ह आणि पत्रकार परिषदेतून खा. डॉ. हीना गावीत व चंद्रकांत रघुवंशी या दोघांनी एकमेकांना अतिशय टोकाचे आरोप केल्याने राजकारणात हा विषय साहजिकच चर्चेत आला. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या संस्थेला रेमडेसिविर इंजेक्शन दिले होते. तो मुद्दा राजकीय झाला आणि रघुवंशी, खा. डॉ. हीना गावीत तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड या त्रिकुटांचे आरोप-प्रत्यारोपाने सध्या जिल्हा ढवळून निघाला आहे. त्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर असल्याने उपाययोजनांसाठी वादविवाद सोडून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करीत मुद्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतरही रघुवंशी आणि गावीत यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांना नगरपालिकेच्या राजकीय मुद्यावर आव्हानही दिले. अर्थात सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाने जनता त्रस्त आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी मृत्यू मात्र चिंताजनक आहेत. लसीकरणाचा वेग अद्याप हवा तसा गतीत आलेला नाही. आरोग्याचे प्रश्न, विकासाचे प्रश्न गंभीर आहेत. अशा स्थितीत कोरोना उपाययोजनांसाठी सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्याबाबत नागरिकांकडूनही कुणाबद्दल तक्रार नाही. नागरिकांना फक्त सेवा हवी आहे आणि ती सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुरवावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांनीच राजकीय व श्रेयाच्या मुद्यावर एकमेकांची उणे-दुणे न काढता एकत्रपणे काम करण्याची आवश्यकता आहे.