नंदुरबार : जिल्ह्यात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तसेच पर्यटन क्षेत्र विकास योजनेअंतर्गत जवळपास २० ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला होता. पैकी दोन प्रस्ताव प्रलंबित असल्याची स्थिती आहे. तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत प्रकाशा तीर्थक्षेत्राला सिंहस्थअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता.
जिल्ह्यात तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत प्रकाशा, जयनगर, शनिमांडळ या गावांना निधी मंजूर केला गेला होता, तर पर्यटन विकासअंतर्गत सारंगखेडा, तोरणमाळ, काठी यांसह इतर गावांना निधी मंजूर केला गेला होता. तीर्थक्षेत्राअंतर्गत प्रकाशा येथे विविध कामे करण्यात आली. सिंहस्थ मेळाव्याच्या काळात या ठिकाणी डीपीडीसी व राज्य सरकारच्या निधीतून विकासकामे करण्यात आली. शनिमांडळ येथे नवीन मंदिराचा प्रस्ताव तयार आहे. जयनगर, नाशिंदा यांसह इतर ठिकाणी कामे करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत दोन प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
पर्यटन क्षेत्र विकासअंतर्गत सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलसाठी तसेच परिसराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मोठ्या प्रमाणावर निधीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र निधी उपलब्ध होऊ शकला नाही. अशीच स्थिती आदिवासींच्या होळीसाठी प्रसिद्ध असलेल्या काठी गावासाठीही निधीची घोषणा झाली आहे. तोरणमाळ पर्यटन विकासाचा आराखडादेखील मंजूर आहे, परंतु निधीसाठी रखडला आहे.