केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शहरातील दारिद्र्यरेषेखालील व गरीब, गरजू घटकातील लाभार्थ्यांसाठी तळोदा नगरपालिकेमार्फत ही योजना राबवली जात आहे. साहजिकच योजनेच्या लाभासाठी शहरातील १८५ लाभार्थ्यांनी पालिकेकडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केले आहेत. तथापि, ही प्रकरणे मंजुरीअभावी पडून असल्याचे या लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. वास्तविक त्यांच्या प्रकरणात काय त्रुटी आहेत हेही त्यांना कळायला मार्ग नाही. त्यावर कार्यवाही झाली तर लाभार्थीदेखील आपल्या प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता करू शकतील. त्यामुळे पालिकेने तातडीने कार्यवाही करून प्रस्ताव मार्गी लावावेत, अशी मागणी या दोन्ही नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांच्याकडे केली आहे.
१०० लाभार्थ्यांचा शेवटचा हप्ताही थकला
मागील डीपीआरमध्ये मंजूर झालेल्या १०० लाभार्थ्यांच्या पाचव्या हप्त्याची रक्कमदेखील थकली आहे. त्यामुळे त्यांची घरकुलांची कामे रखडली आहेत. याबाबत चौकशी करून ही थकलेली रक्कम तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावी. कारण पैशांअभावी लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लाभार्थ्यांच्या प्रस्तावात जागेच्या त्रुटी
घरकुल योजनेसाठी या लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावात जागेच्या त्रुटी असल्याचे पालिकेच्या संबंधित विभागाने सांगितले आहे. कारण लाभार्थी राहतात त्या घराची जागा त्यांच्या नावावर नाही. हीच मुख्य अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या पाचव्या हप्त्याची रक्कम थकलेली आहे त्या उर्वरित रकमेची शासनाकडे मागणी केली आहे. तब्बल सहा वेळा यासाठी पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र अजूनही रक्कम पालिकेस प्राप्त झालेली नाही. ही रक्कम आल्याबरोबर लाभार्थ्यांना वर्ग केली जाईल, असेही सांगण्यात आले.
शहरातील गरीब लाभार्थ्यांचे घरकुलांचे प्रस्ताव मंजुरीअभावी पडून आहेत. पालिकेने त्यावर कार्यवाही केली तर लाभार्थ्यांनाही कागदपत्रांची पूर्तता करता येईल. मात्र कार्यवाही होत नसल्यामुळे ते सारखे हेलपाटे मारत असतात.
- अनिता परदेशी, नगरसेविका, तळोदा पालिका