पाणीटंचाईवर मात करण्याची मागणी
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाईत वाढ होत आहे. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्याचे काम अद्यापही सुरु झालेले नाही.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
नंदुरबार : तालु्यातील काकर्दे व सिंदगव्हाण परिसरात गेल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करुन भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे. या भागात बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे वार्षिक गणित बिघडले आहे.
शेतीकामांना गती
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे परिसरात शेतीकामांना गती देण्यात येत आहे. या भागात हरभरा कापणी व गहू कापणीला वेग आला आहे. यामुळे मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे. परिसरातील मजूर आसपासच्या गावांच्या शिवारातही कामांसाठी बोलावले जात आहेत.
समस्या कायम
धडगाव : तालुक्याच्या विविध भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पथदिवे सुरु करण्याबाबत उदासिनता कायम आहे. आरोग्य केंद्रांमध्ये लाखो रुपयांचा खर्च करुन साैर पथदिवे आणि हायमस्ट लावण्यात आले होते. परंतू हे दिवे सध्या बंद पडले असल्याचे दिसून येत आहे.
भाजीपाला उत्पादक संकटात
नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात भाजीपाला उत्पादित करुन त्याची विक्री बाजार समितीत करणाऱ्या शेतकऱ्यांना संकटाने घेरले आहे. दोन दिवसांच्या लाॅकडाऊननंतर एप्रिल महिन्यात पुन्हा लाॅकडाऊन असल्याने भाजीपाला उत्पादक अडणीत येणार आहेत. तालुक्याच्या विविध भागात पिकवला जाणारा भाजीपाला दीर्घकाळ साठवण्याची सोय नसल्याने शेतकरी आतापासून हैराण झाले आहेत.
फिरते पथक वाढवा
नंदुरबार : आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात फिरत्या स्वॅब संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके ग्रामीण भागात पोहोचत आहेत. परंतू पथकांची संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक जण अद्यापही वंचित असल्याने पथकांची संख्या वाढवण्याची मागणी आहे.
गावांमध्ये शुकशुकाट
नंदुरबार : दोन दिवसीय लाॅकडाऊनला शनिवारी प्रारंभ झाला. यात शहरी भागाचा समावेश असला तरीही ग्रामीण भागात अनेकांनी व्यवसाय बंद ठेवल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये अनेकांनी काही तास दुकाने सुरु ठेवत कोरोनाला हरवण्याचा चंग बांधला आहे.
हिंस्त्र प्राण्यांच्या संचाराने वाढली चिंता
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गावांमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा धोका कायम आहे. बोरदसह सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या शिवारात अस्वल आणि बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसून येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पीक कर्ज द्यावे
बोरद : तळोदा तालुक्यातील नियमित पीक कर्ज घेणाऱ्या
शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने एप्रिल महिन्यात कर्जाचे वितरण करण्याची मागणी होत आहे. याबाबत शेतक-यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. दरम्यान ग्रामीण बँकांकडूनही कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.