नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ हळूहळू कमी होत आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्यादेखील ३०० च्या घरातच राहत आहे. सुदैवाची बाब म्हणजे दहा दिवसांत रिकव्हरी रेट हा दहा टक्क्यांनी वाढला आहे. सध्या रिकव्हरी रेट हा ७६ टक्के असून, तो ९० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमालीचा उंचावला होता. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळू लागला आहे. त्यातही कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने कोरोना संकटातही आशेचा किरण दिसू लागला आहे. येत्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासह रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
दहा टक्के वाढ...
जिल्ह्यात दहा दिवसांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे. १५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या २८ हजार १८७ होती. त्यातील १८ हजार ६२६ रुग्ण बरे झाले होते. त्याची टक्केवारी ही ६६.०८ टक्क्यांपर्यंत होती, तर २५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या ३२ हजार ८६३ होती. त्यातील २५ हजार सात रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याची टक्केवारी ही ७६ टक्के इतकी आहे. अर्थात दहा दिवसांत पॅाझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांनी वाढला आहे.
वाढत्या सुविधांचा परिणाम
जिल्ह्यात कोरोनावर उपचारासाठी वाढविण्यात आलेल्या सेवा व सुविधा पाहता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. येत्या काळात आणखी बेडची संख्या आणि आरोग्य सेवा वाढविल्या जाणार असल्यामुळे कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
दर ९० टक्क्यांपर्यंत नेणार
जिल्ह्यात रिकव्हरी रेट हा ९० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेली कडक संचारबंदी व त्यामुळे कोरोना साखळी तुटण्याचे प्रमाण पाहता ९० टक्के रिकव्हरी रेट साध्य करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रुग्णसंख्याही होतेय कमी
सध्या रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. १९ एप्रिल रोजी २८६ रुग्ण आढळून आले होते. २० रोजी २६५, २१ रोजी २५६, २२ रोजी २९३, २३ रोजी ४५९, २४ एप्रिल रोजी ४२७ रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात चाचण्यांची संख्या वाढविली असल्यामुळे रुग्णसंख्यादेखील वाढत आहे.
अशी आहे आकडेवारी
१५ एप्रिल रोजी एकूण २८ हजार १८७ रुग्ण होते. त्यातील १८ हजार ६२६ रुग्ण बरे झाले. त्यांचा रिकव्हरी रेट हा ६६.०८ टक्के होता.
२५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या ही ३२ हजार ८६३ पर्यंत गेली. त्यातील २५ हजार सात रुग्ण बरे झाले. त्यांचा रिकव्हरी रेट हा ७६ टक्के इतका राहिला.
आतापर्यंत एकूण एक लाख पाच हजार ६९ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
सध्या ३२५ जण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत.
जनरल क्वारंटाइन जवळपास चार हजार ५३५ इतके आहेत.