लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जे झाले ते नियमानुसार झाले. मात्र, काही जण त्याचा बाऊ करून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी जिल्हा प्रशासनावर आरोप करीत आहेत. वास्तविक सध्या कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे कृपा करून गैरसमज पसरवू नका, लोकांमध्ये जनजागृती करा, अशी आर्त हाक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी रात्री फेसबुक लाईव्हवरून केली.
जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट व आरोग्य संदर्भातील केलेल्या कामाचा बोलबाला राज्यातच नव्हे तर देशात होत असताना स्थानिक पातळीवर काही लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या विरोधात सातत्याने आरोप होत आहेत. विशेषत: एका संस्थेला दिलेल्या रेमडेसिविरबाबत सातत्याने चर्चा करून आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेला रेमडेसिविर कुठल्या नियमानुसार दिले त्याबाबतचे कागदपत्र त्यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये जाहीर केले. रेल्वे आयसोलेशन बोगी संदर्भातही झालेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र त्यांनी सादर केले. ते म्हणाले, मी या जिल्ह्यात अधिकारी म्हणून आलो आहे. काही दिवसांचा पाहुणा आहे. पण हा जिल्हा तुमचा आहे. जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी सर्वांनीच चांगले काम करावे अशी अपेक्षा आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने जे करायचे ते करीत आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी जे जे शक्य ते प्रशासन करीत आहे. हा जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण झाला असा आपला दावा नाही. पण तीन प्लांट सुरू झाले आहेत. इतरही सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. जे झाले ते आपण एकट्याने केले नाही. त्यासाठी सर्वांची साथ लाभली म्हणूनच ते शक्य झाले.
जिल्ह्यात आरोग्याच्या खूप काही सुविधा नसताना गेल्या वर्षभरात मोठे काम उभे झाले आहे. अर्थात त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. पण काहीजण हेतूत: वारंवार प्रशासनाविरोधात आरोप करीत आहेत. खरे तर ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही. लसीकरणाबाबत सर्वत्र उत्साह असतांना जिल्ह्यात मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.