नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यातुलनेत तीन टक्के कमीच मतदान झाले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वर्षभरानंतर ८७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर प्रशासन अनेक बाबींपासून लांब होते. यातून कोरोना नियमांचे पालन करून निवडणुका घेण्यात आल्या. यातून मतदार जनजागृतीचा एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. यातून २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतींत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सर्वच तालुक्यात मतदानाची टक्केवारी ही ५० टक्केपेक्षा अधिक असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता गेल्या काही वर्षातील जनजागृतीमुळेच हे शक्य झाल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभा मतदार संघासाठी मतदान
धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. यातून नंदुरबार जिल्ह्याचे सहा आणि धुळे जिल्ह्यातील दोन अशा आठ तालुक्यातील १८ लाख ७० हजार ११७ मतदारांचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. २०१९ या वर्षात सर्व आठ तालुक्यात ६८.३३ टक्के मतदान झाले होते. एकूण मतदारांच्या तुलनेत ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळीही प्रशासनाने जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता.
चार मतदारसंघात विभागणी
जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. यात शहादा - तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा - धडगाव आणि नवापूर यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ११ लाख मतदारांचा यात समावेश आहे. या मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सहभाग नोंदवल्याने ६५.५० टक्के मतदान झाले होते. या मतदानासाठीही प्रशासनाने वेळोवेळी उपक्रम राबवत, महिला मतदान केंद्र, विशेष शिबिरांचे आयोजन केले असल्याने ही टक्केवारी वाढली होती.
वर्षभर कोरोनाचा ताप तरीही घटत्या मतदानाला बसला चाप
जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींत एकूण १ लाख ११ हजार २३६ मतदारांचा समावेश होता. यातील ८६ हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल ७७ टक्के मतदान झाल्यानंतर प्रशासनाने समाधान व्यक्त केले होते. वर्षभर कोरोनासाठी धावपळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही जनजागृती आणि परिश्रमाविनाच मतदानाची टक्केवारी ही ७०च्या पुढे गेल्याने येत्या काळातही जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढणार असल्याचे निर्धारित करण्यात आले आहे.