नंदुरबार : जिल्ह्यात पाच वर्षात २२ हजार नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआराेग्य योजना खासगी सहाय्यकारी ठरली आहे. योजनेत उपचार मिळत असल्याने शासनाने यात खासगी रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु शासनाकडून कोरोनाबाधितांना केवळ २० हजाराचे पॅकेज मिळत असल्याने रुग्णांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा नऊ रुग्णालयात कोरोनावर उपचार होतात.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३६ हजाराच्या घरात आहे. यातून ३३ हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत बरे झालेल्या बहुतांश रुग्णांनी मेडिक्लेम व जनआरोग्यचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, यात मेडिक्लेम मंजूर होताहेत. परंतु जनआरोग्यचे पॅकेज तोकडे असल्याने त्याला प्रतिसाद मिळत नाही. कागदपत्रेच अधिक असल्याने नागरिक या भानगडीतच पडत नाहीत. विशेष बाब म्हणजे कोविड हाॅस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २४ जणांनी योजनेसाठी अर्ज केल्याचे समोर आले असून, एकमेव खासगी रुग्णालयातून एकानेही आजवर अर्ज केलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
नंदुरबार शहरातील पाटील सर्जिकल व एन्डोस्कोपी, मेडिकेअर हाॅस्पिटल, स्मित हाॅस्पिटल्स, सुश्रुत नर्सिंग होम व जय श्री दत्त ॲक्सिडेंट हाॅस्पिटल याठिकाणी जनआरोग्य योजनेतून ९७१ आजारांवर उपचार होतात. याठिकाणी कोरोना काळात २२४ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात जनआरोग्य योजनेचा लाभ देणाऱ्या वरील पाचपैकी केवळ एकाच ठिकाणी कोरोनावर उपचार केले जातात. परंतु याठिकाणी शासनाकडून देण्यात येणारे पॅकेज तोकडे असल्याने रुग्णच योजनेकडे पाठ फिरवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी तब्बल २१ रुग्णालये आहेत. कोरोनावर उपचारासाठी लागणारी औषधी, इंजेक्शन्सही अत्यंत महागडी असताना २० हजाराच्या पॅकेजमधून रुग्णाला द्यावे काय असा, प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाकडून कोरोना आजाराचा समावेश जनआरोग्य योजनेत करण्यात आला असला तरी खासगी रुग्णालयांना योग्य मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नसल्याचा दावा केला जातो. रुग्णाच्या उपचारासाठी केवळ १८ हजाराचे पॅकेज देण्यात आल्याची माहिती खासगी रुग्णालयातून देण्यात आली.
अशी करा नोंदणी
या योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते. कागदपत्रे जवळ नसतील तरी उपचार सुरू करून नंतर कागदपत्र देता येतात. थेट रुग्णालयात जाऊन आरोग्य मित्रांकडून या योजनेची माहिती दिली जात आहे.
योजनेत जिल्ह्यात एकच रुग्णालय असल्याने त्याबाबत एकही तक्रार नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष ठेवून असतात.
कोरोना उपचारानंतर देण्यात येणारी मदत अल्प असल्याने अनेकांना गरज असून, योजनेत सहभागी न होता आल्याचे सांगण्यात आले.