शहादा : शहरातील डोंगरगाव आणि मोहिदा चौफुली नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत़ मंगळवारी मोहिदा चौफुलीवर अपघातात पती-पत्नी जखमी झाले होते़ यातील जखमी पतीचा उपचारदरम्यान बुधवारी मृत्यू झाल्याने दोन्ही चौकांची समस्या ऐरणीवर आली आहे़सेंधवा ते विसरवाडी हा नवीन महामार्गाचे रुंदीकरण सध्या शहादा शहरात सुरू आहे़ जुन्या वळणरस्त्याचे रुंदीकरण केल्याने उंची वाढली आहे़ एकीकडे विकास सुरू असताना दुसरीकडे उंच झालेल्या रस्त्यामुळे महामार्गावर येताना वाहनच दिसत नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे़ शहादा तालुक्यातील उत्तर आणि पूर्व भागातील गावांना जोडणारे रस्ते प्रामुख्याने महामार्गाच्या पलीकडे आहेत़ या चौफुलीच्या चहूबाजूने रहिवासी वसाहती आणि शाळांची उभारणी झाली आहे़ महामार्गाची उंची वाढल्याने हा चौक असमतोल झाल्याने दरदिवशी अपघात होत आहे़वाहनधारक रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच हे अपघात होत आहेत़ रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग हा ताशी १०० ते १२० पर्यंत राहत असल्याने गेल्या दोन वर्षात आठ जणांना जीव गमावावा लागला आहे़ मंगळवारी रस्ता ओलांडत असतानाच पाडळदा येथील मोहन तुकाराम पाटील यांच्या दुचाकीला पपई वाहून नेणाऱ्या ट्रकने थेट धडक दिल्याने पत्नी अनितासह मोहन पाटील हे लांबवर फेकले जाऊन जखमी झाले होते़ त्यांचा धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला़या घटनेमुळे नागरिकांनी गांभीर्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली आहे़
शहाद्यातील वळणरस्त्यावरील चौक ठरताहेत ‘मृत्यूचे सापळे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:04 IST