नंदुरबार : कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. जेमतेम शाळा सुरू झाल्या, विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली, त्यांचे शाळेत मन रमू लागले तोच प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकही चिंतेत सापडले आहेत. दुसरीकडे मुलंही आपल्या पालकांची काळजी घेतांना दिसून येत आहेत. बाहेर जातांना किंवा बाहेरून आल्यावर विविध सूचना पालकांना त्यांच्याकडून ऐकाव्या लागत असतात. यासंदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांना पत्र पाठवून याबाबत जागृती केली आहे.
कोरोनाने होरपळलेल्या जनतेला गेल्या चार ते पाच महिन्यात बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता. शाळाही सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी रमू लागले आहेत. अशात आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा वेळी घरातील मुलं आपल्या आई-बाबांना बाहेर जातांना व बाहेरून आल्यावर घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत आणि होणारी काळजी याबाबत सूचना देत असतात. त्यात मास्क घेतला का? सॅनिटायझरची बाटली खिशात आहे का? सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळा, घरात आल्यावर आधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करा, नंतर गरम पाण्याने हातपाय धुवा अशा सूचना केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही जागृती येत आहे.
स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबांचीही काळजी घ्या!
n प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, तसेच आई, वडील, भाऊ-बहीण, शेजारी यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा, त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
n आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जातांना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का? हे देखील पहा. असा सल्ला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
कोट...
प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घराबाहेर निघतांना मास्कचा आवश्यक वापर करावा. कुठेही विनाकारण हात लावू नका. सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करा. आपण काळजी घेतली तर आपले कुटुंब सुरक्षित राहील. किमान आपल्या कुटुंबासाठी तरी कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले आहेच. आपल्या एका चुकीमुळे घरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकेल, अशी कृती करणे टाळा आणि नियम पाळा.
-डॅा.के.डी. सातपुते,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.
कोरोनाबाबत आम्ही शाळेत काळजी घेतोच. शिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करतो. आमच्या आई-बाबांनीही घराबाहेर पडतांना आवश्यक काळजी घेतली तर कोरोनाला आपण लांब ठेवू शकतो. त्यासाठी मी दररोज बाबांना सांगत असते.
-आर्या पाटील, विद्यार्थिनी.
बाबा दररोज ॲाफिसला जातांना मास्क व सॅनिटायझर सोबत नेतात. काही वेळा घाईत त्यांना आठवण राहिली नाही तर मी किंवा आई त्यांना आठवण करून देतो. आम्हाला आमच्या बाबांची व बाबांना आमची काळजी असल्याने आम्ही दक्ष आहोत.
-पालवी जाधव, विद्यार्थिनी.
आमच्या कुटुंबाने सुरुवातीपासून कोरोनाला हरविण्याचा संकल्प केला आहे. आताही आम्ही काळजी घेत आहोत. आरोग्यमंत्र्यांचे आलेले पत्र फारच महत्त्वाचे आहे. प्रत्ोकाने काळजी घेतली तर कोरोना आपल्यापर्यंत कधीही येऊ शकणार नाही.
-नेहा पटेल, विद्यार्थिनी.
शाळा सुरू झाल्यापासून मी नियमित शाळेत जात आहे. शिक्षकांच्या आणि पालकांच्या सूचनांचे पालन केले जात आहे. घरातही आवश्यक ती काळजी घेतोच. बाबा बाहेर जातांना नियमित मास्क घालून जातात. कॉलनीतील इतरांनाही मी तसे सांगत असतो.
-निखिल सोनवणे, विद्यार्थी.
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालूनच बाहेर पडावे. आम्ही शाळेत देखील प्रत्येकजण मास्क घालतो. वर्गात जवळजवळ बसत नाही, किंवा पटांगणात देखील जास्त एकमेकांच्या जवळ जात नाहीत. कुठल्याही वस्तूला हात लावत नाहीत.
-प्रितेश सावंत, विद्यार्थी.