नंदुरबार : एकीकडे बालकामगारविरोधी मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून बालकामगार आढळून येत असल्याचे स्पष्ट होते. नुकतीच राबविली गेलेल्या शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिमेत ३० बालकामगार आढळून आले. याशिवाय ७५८ बालके ही आपल्या आई-वडिलांसोबत परजिल्हा व परराज्यांत स्थलांतरित झाली होती. तेथेही मजुरी त्यांच्या पाचवीला पुजलेलीच असल्याचे स्पष्ट होते.
जिल्ह्यात औद्योगीकरण नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांचा रोजगार हा शेतीची कामे किंवा गाव, परिसरातील लहानमोठी कामे व रोहयोच्या कामे यांवर अवलंबून असतो. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या पाहता कुटुंबाला हातभार लागावा यासाठी घरातील मोठ्या सदस्यांसह लहान मुलेही कामाला जाऊन त्यातून मिळालेल्या रोजगारावर कुटुंबाचा खर्च चालवीत असतात. सध्या संचारबंदी व लॉकडाऊनमुळे अशा कुटुंबांची मोठी फरफट पाहावयास मिळत आहे. नुकत्याच झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेत बालमजुरांचीही नोंदणी करण्यात आली होती. त्यात ३० बालमजूर आढळून आले होते.
सर्वाधिक अक्कलकुवा
सर्वाधिक बालमजुरांची नोंद ही अक्कलकुवा तालुक्यात करण्यात आली होती. तालुक्यात एकूण २८ बालमजूर आढळले. याशिवाय नंदुरबार तालुक्यात दोन बालमजूर आढळून आले. इतर तालुक्यांत मात्र बालमजुरीच नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले असले तरी परिस्थिती मात्र तशी नाही.
७५८ बालके परराज्यांत
जिल्ह्यातील ७५८ बालके ही आईवडिलांसोबत परजिल्हा व परराज्यांत मजुरीसाठी स्थलांतरित झाली होती. या बालकांना तेथे आईवडिलांसोबत काम करावे लागत असते, हे कुणीही नाकारून चालणार नाही. त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी किंवा स्थानिक ठिकाणी बालमजूर म्हणून नोंदणी केली जात नाही. परिणामी अशी बालके लाभापासून वंचित राहतात. सर्वेक्षणात १२३ बालके ही परजिल्ह्यांत, तर ६३५ बालके ही परराज्यांत स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले होते.
वर्षभरात मोठी भर
गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे गावातील बालके ही शेतीकामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र होते. कापूस वेचणीच्या हंगामात कापूस वेचणी करणे व इतर कामे रोजंदारीने या बालकांकडून केली जात असल्याचे चित्र होते. ऑनलाईन शाळा सुरू असल्या तरी ग्रामीण भागात त्याचा लवलेशही दिसून आला नाही. त्यामुळे पालकांच्या संमतीने अनेक बालके ही थेट शेतांमध्ये कामाला जात होती. वर्षभरात हे चित्र प्रकर्षाने दिसून आले.