आतापर्यंत शेतकऱ्यांनी मागील हंगामातील शिल्लक व चालू हंगामातील प्राप्त असे एकूण जवळपास १२ हजार ९४१ मे.टन युरीया खताची खरेदी केली आहे. शेतकरी बांधवांनी एकाच वेळी पूर्ण हंगामात लागणारा युरीया खरेदी न करता पिकाच्या गरजेनूसार व वाढीच्या आवश्यकतेनुसार खरेदी करावा. अनावश्यक साठा करु नये, जेणेकरुन सर्वांना खत उपलब्ध होईल व तुटवडा जाणवणार नाही.
शेतकरी बांधवांनी खत खरेदी करतेवेळी आधार कार्ड घेवून जावे. शेतकऱ्यांनी खताच्या एकाच ग्रेडचा आग्रह न धरता उपलब्ध असलेल्या खतामधून आपली गरज भागवावी. पिकांना फक्त युरीया खताचीच आवश्यकता नसून इतरही घटक पिकांच्या वाढीसाठी व उत्पादन वाढीसाठी आवश्यक असतात हे विचारात घेवून युरीयासोबत कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रासायनिक खताचा प्रमाणात वापर करावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी केले आहे.