शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रकाशाकडून शहादाकडे पपईने भरलेला ट्रक (क्रमांक जी.जे. ०१ सीटी १३३९) भरधाव वेगाने येत असताना शिरूडकडून शहाद्यात येणारे मोटरसायकलस्वार (क्रमांक एम.एच.३९ पी- ६९६३) चौफुली रस्ता ओलांडत असताना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात मोटरसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यातील पुरुषोत्तम हिरामण पाटील (४६, रा.गांधी चौक, शहादा) यांना उपचारासाठी धुळे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर विलास लिमजी पाटील (५०, रा. मलोणी) यांच्यावर शहादा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सुरत येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच शहरातील गुजर गल्लीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तुषार पाटील, प्रशांत पाटील, भरत पाटील, मिलिंद पाटील, संदीप पाटील, मुन्ना पाटील, कमलेश पाटील, यशवंत पाटील, सुरेश पाटील, गिरीश पाटील, हर्षल पाटील, बादल गिरासे, कृष्णा पाटील यांच्यासह अनेक युवकांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याच्या कामाची गती वाढली असून प्रकाशा ते शहादा रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यात शिरूड चौफुली रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा अतिक्रमण वाढल्याने व काहींनी प्लॅस्टिक कागद टाकून मोठमोठ्या टपऱ्या उभारल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिरूड चौफुली श्री स्वामी विवेकानंद बसथांबा हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाने रस्त्याच्या आजूबाजूस असलेले बेकायदा अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.