कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. महाराष्ट्रही त्यात मागे नसल्याने राज्य सरकारने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांची संचारबंदी लावली आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असल्याने नागरिक धास्तावले असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक व अति गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनीही लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना शहादा शहरात मात्र लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड सोबतच पॅनकार्ड किंवा मतदान कार्डची सक्ती काही लसीकरण केंद्रावर केली जात असल्याची ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे. ज्या केंद्रावर पहिला डोस घेतला त्याच केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्डसोबतच पॅन कार्ड किंवा मतदान कार्डची मागणी करण्यात येत आहे. पहिला डोस देताना फक्त आधार कार्ड लागल्याने नागरिक आधार कार्ड सोबत घेऊन जात आहेत. मात्र लसीकरण केंद्रावर पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड नसेल तर परत पाठवले जात आहे. खेड्यावरून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास . शिवाय अनेक नागरिकांकडे पॅनकार्ड नसल्याने ते लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लसीकरणाचे केंद्र वाढवून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याची आवश्यकता असताना पॅनकार्ड किंवा मतदान कार्डची सक्ती कशासाठी? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. काही केंद्रांवर अजूनही केवळ आधार कार्ड घेऊन लसीकरण केले जात असताना काही केंद्रांवर पॅनकार्डबाबत अडवणूक का करण्यात येत आहे? याबाबत नक्की शासनाचे काय आदेश आहेत, हे प्रशासनाने जाहीर केले पाहिजे. तसेच कोरोना लसीचा डोस देताना आधार कार्डव्यतिरिक्त इतर कागदपत्रांची मागणी करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे.
लसीच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST