नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, सिकलसेल, यासारखे गंभीर आजारांचे प्रश्न असताना, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र खिळखिळी आहे. आरोग्याच्या प्रश्नावरच गेल्या चार दशकात पाच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन दुर्गम भागात अश्रू गाळले, पण त्या अश्रुंची फुले झाली नाहीत. अनेक योजनांची घोषणा झाली. निधीची घोषणा झाली, पण ते सर्व हवेतच विरले. जेव्हा कोरोनाचा संसर्ग आला, तेव्हा आरोग्य यंत्रणेची कमतरता प्रकर्षाने जाणवली, पण त्याही परिस्थितीत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन आणि लोक प्रतिनिधींनी एक-एक सोईसुविधांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रयत्न केला. जिल्ह्यात साधी कोरोनाच्या चाचणीसाठी लॅब नव्हती. दुसऱ्या जिल्ह्यावर त्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. ही लॅब आली. त्याचा विस्तारही झाला. नवीन रुग्णवाहिका शववाहिका व दुर्गम अतिदुर्गम भागात ॲम्बुलन्सच्या समस्येवर बाईक ॲम्बुलन्स आल्या. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट आला. त्याचा विस्तारही सुरू आहे. केवळ ५० ऑक्सिजन बेडची क्षमता असलेल्या शासकीय रुग्णालयांमधील बेडचा विस्तार ४५० पर्यंत झाला आहे. अजूनही विस्तार सुरू आहे. विलगीकरणासाठी सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक बेडची सुविधा झाली. त्यामुळे आता कुठल्याही रुग्णाची बेड मिळत नसल्याची तक्रार येणार नाही, असा जिल्हाधिकारी यांनी विश्वासही व्यक्त केला. हा त्यांचा विश्वास निश्चितच जिल्ह्यातील जनतेला दिलासा देणारा असला, तरी रुग्णसेवेसाठी मात्र डाॅक्टर आणि परिचारिकांची आवश्यकता लागणार आहे, हे विसरून चालणार नाही. आधीच जिल्ह्यात रिक्तपदांची संख्या मोठी आहे. जिल्हा रुग्णालयात १४ वर्ग एकचे डाॅक्टर नाहीत. आरोग्य विभागात ४१७ पदांसह तीन वर्ग एकचे अधिकारी नाहीत, याशिवाय स्वतंत्र कोविड रुग्णालयासाठी भरती काढूनही डाॅक्टर मिळत नाहीत. अनेक पदे अजूनही रिक्त आहेत. अशा स्थितीत स्पेशलिस्ट डाॅक्टरांसह कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डाॅक्टर आणि परिचारिकांची पदे भरण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू झाले आहे. या महाविद्यालयासाठी तज्ज्ञ वैद्यकीय प्राध्यापकांची नियुक्ती झाली आहे. सध्या कोरोनामुळे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे या डाॅक्टरांचाही व त्यांच्या ज्ञानाचा वापर जिल्ह्यातील कोरोना हरविण्यासाठी झाला पाहिजे.
आता डाॅक्टरांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST