नंदुरबार : लसचा पुरेसा साठा उपलब्ध राहत नसल्याने लसीकरणाची कासवगती कायम आहे. दुसऱ्या डोससाठी तर अनेकांची फिरफिर होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३३ टक्के लसीकरण झाले आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी अतिशय कमी असल्याचे चित्र आहे. लसीकरण केंद्र वाढवून पुरेशा डोसची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे, तरच लसीकरणाचा वेग वाढणार आहे.
१६ जानेवारीपासून लसीकरण
नंदुरबारात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. सुरुवातीला केवळ सहा केंद्रांवर लसीकरण केले गेले. नंतर लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाइन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतरच्या टप्प्यात सर्वसामान्यांना लसीकरण केले गेले. त्यातही ४५ वर्षापेक्षा अधीकचा वयोगट आधी घेतला गेला. नंतर १८ च्या पुढील वयोगटाला लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असली, तरी त्याचे प्रमाण अद्यापही ३५ टक्केपेक्षा अधिक जावू शकले नसल्याचे चित्र स्पष्ट आहे.
जिल्ह्यात एकूण ८७ लसीकरण केंद्र आहेत. त्यात, आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय व शहरी भागातील अर्थात नंदुरबार व शहादा नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे, तसेच सामाजिक सभागृहे आणि पालिका शाळांमध्येही केंद्र आहेत. पहिला डोस घेतलेल्या बहुतांश नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झाले आहेत; मात्र त्यांना लस घेता आलेली नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडून डोसची मागणी नोंदवण्यात आली आहे; परंतु केवळ टप्प्याटप्प्याने लसींचा पुरवठा होत आहे.