वीजपुरवठा मर्यादित असल्याने लागवड झालेल्या पिकांना वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसाळ्यातच बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरणी केली असल्याने त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून आभाळ पूर्ण भरून येते. मात्र, पावसाच्या किरकोळ सरी वगळता दमदार पाऊसच येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईला पाऊस पडल्यास आपल्या परिसरात दोन ते तीन दिवसांत पाऊस येतोच, असा कयास बांधला जात होता व त्याप्रमाणे पावसाचे आगमन होत असे, असा अनुभव ज्येष्ठांनी व्यक्त केला. मुंबई तुडुंब भरली असतानाही आपल्या परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्याचा शेवट आल्याने खरीप हंगाम सापडणे शक्य नसल्याचे चित्र आहे. मूग, उडीद, चवळी, मठ यासारख्या कडधान्यांचे व ज्वारी, बाजरी, नागली यासारखी अन्नधान्य पिके हातची गेल्याची स्थिती आहे. लोणखेडा गावालगत असलेली गोमाई नदी अजूनपर्यंत दुथडी वाहलेली नाही. या नदीच्या उगमाकडे थोडाफार पाऊस झाल्याने मुक्या जनावरांना पुरेल एवढे पाणी नदीला आलेले आहे. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय परिसरात केले जात आहेत. लवकरच पाऊस येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.
लोणखेडा परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST