नंदुरबार : कोरोना लसीकरणासाठी आधार किंवा पॅन कार्डशिवाय लस दिली जात नाही. लसीकरणाचे रेकॅार्ड अद्यावत ठेण्यासाठी हे दोन पुरावे आवश्यक असले तरी जे उघड्यावर राहतात व ज्यांच्याकडे हे दोन्ही पुरावे नाहीत त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार आहे. अर्थात सामान्यांचे लसीकरण पुर्ण झाल्यावर त्यांच्याबाबत काय विचार केला जातो यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात उघड्यावर राहणाऱ्या कुटूंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नंदुरबारात रेल्वे स्थानक असल्यामुळे रेल्वेने येणारे भिकारी व मानसिक रोगी यांची संख्या अधीक आहे. याशिवाय व्यवसायानिमित्त आलेले अनेक कुटूंब शहरालगतच्या मोकळ्या जागांवर तात्पुरता निवारा करून राहत असतात. अशांची संख्या साधारणत: दीड हजारापेक्षा अधीक जाऊ शकते. अशा नागरिकांकडे ना आधारकार्ड ना पॅनकार्ड मग त्यांना लसीकरण कसे होईल हा प्रश्नच आहे. सर्वसामान्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांच्याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे.
आधार, पॅनकार्ड नसेल तर पर्याय काय...
n लसीकरणाकरीता नोंदणीसाठी आधारकार्ड व पॅनकार्ड सक्तीचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून हे दोन पुरावे आवश्यक आहेत. परंतु ज्यांच्याकडे हे दोन्ही पुरावे नाहीत त्यांना मात्र अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी मात्र आरोग्य विभागाने कुठलाही दिलासा दिलेला नाही.
n आधारकार्ड प्रत्येक नागरिकाकडे असतेच. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही. परंतु जे उघड्यावर राहतात, ज्यांचे कार्ड नाही त्यांना शासनाच्या नव्याने तयार होणाऱ्या नियमावलीत काहीतरी दिलासा मिळू शकतो.
n सध्या ४५ वर्ष वयावरील व्यक्तींनाही लस दिली जात आहे. त्यासाठी आजाराचे कारण आणि डॅाक्टरांची फाईल महत्वाची आहे. त्यानंतरच ॲानलाईन किंवा ॲाफलाईन नोंदणी केली जात आहे.
बेघर निवारेच नाहीत...
n जिल्ह्यात बेघरांसाठी निवारे नाहीत. नंदुरबार पालिकेने पालिका शाळा क्रमांक एक च्या परिसरात बेघर निवारा सुरू केला आहे. परंतु त्यात अगदीच अत्यल्प जण राहत असतात.
n बेघर निवारे राहिले म्हणजे त्यांना आधारकार्ड काढण्यास मदत होते. परंतु बेघर निवारे नसल्यामुळे अनेकजण त्यापासून वंचीत राहत आहेत.
n नंदुरबारातील रेल्वेस्थानक परिसरात १०० ते दिडशे भिकारी राहत असतात. त्यातील अनेकजण वर्षानुवर्षापासून येथे राहतात. त्यांच्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे.
लसीकरण करतांना प्रत्येक डोसची नोंद ठेवावी लागते. चोरीस जाऊ नये, गहाळ होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी लसीकरणाकरीता नाव नोंदणीला येणाऱ्यांची ओळख पटावी म्हणून ओळखीचा पुरावा म्हणून आधार किंवा पॅनकार्ड आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बेघर किंवा भिकारी यांच्याबाबत शासन निर्णय घेईलच असेही त्यांनी सांगितले.