शासकीय कार्यालयात शुकशुकाट कायम
नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ शासकीय कर्मचारीच दिसून येत आहेत. पंचायत समिती, तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या दीड महिन्यापासून शुकशुकाट पसरला आहे.
राज्य मार्गाच्या दुरुस्तीमुळे दिलासा
नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा ते नाशिक जिल्ह्यातील विंचूर या राज्य मार्गाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होते. कोरीट मार्गाने वडबारे, रनाळे, शनिमांडळ मार्गाने विंचूरकडे जाणारा हा राज्य मार्ग आहे. यासाठी बांधकाम विभागाने सातत्याने निधी दिला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पुढील टप्प्यात शनिमांडळ गावातून बायपास निघण्याची शक्यता आहे.
मिनी बसस्थानक हवे
अक्कलकुवा : तालुक्यातील खापर येथे मिनी बसस्थानक निर्माण करण्याची जुनी मागणी आहे. खापर मार्गाने गुजरात राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या मोठी आहे. या बसेस खापर गावात काही काळ विश्रांती घेतात. परंतु योग्य जागा नसल्याने बसेस रस्त्यावर थांबवण्यात येतात.
दुरुस्त्या टळल्या
नंदुरबार : जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जलस्वराज्य योजनेंतर्गत साधारण ५०० ग्रामपंचायतींनी जलकुंभांची उभारणी करत पाणी योजना सुरू केली होती. या पाणी योजनांचा बोजवारा उडाला असून, वर्षानुवर्षे जलकुंभांची दुरुस्ती टळत आहे. काही ठिकाणी जलकुंभ कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी बऱ्याच वर्षांपूर्वी सार्वजनिक हाैद अर्थात गावहाळ तयार करून घेतले होते. परंतु कालांतराने तेथील पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने हाैद निरुपयोगी ठरत आहेत. यातून गुरांना बंधारे किंवा साचून असलेले पाणी देण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.
विजेचा लपंडाव
नंदुरबार : शहरालगतच्या वाघोदा, पातोंडा, राकसवाडे, दुधाळे आणि होळ तर्फे हवेली शिवारातील वसाहतींमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. यातून नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून वीज पुरवठा अनियमितपणे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, कारवाईची मागणी आहे.
झुडपे वाढली
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत. ही झुडपे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. ग्रामपंचायतींनी ही झुडपे काढण्याची कारवाई करावी, अशी मागणी आहे. झुडपांमुळे किरकोळ अपघात होत आहेत.
रॅपिड टेस्ट केंद्रांवर सामसूम
नंदुरबार : आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात रॅपिड अँटिजन चाचण्या व आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी स्वॅब संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गेल्या महिन्यात नागरिकांच्या रांगा लागत होत्या. परंतु गेल्या चार दिवसात मात्र ही केंद्र सामसूम आहेत. कोरोनाबाधितांची संख्या तसेच लक्षणे असलेल्यांची संख्या घटली असल्याने केंद्रांवर नागरिक येत नसल्याचे सांगण्यात आले .
कांदा आवक घसरली
नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून होणारी कांदा आवक कमी झाली आहे. यातून किरकोळ बाजारात कांदा दर काहीअंशी वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार दिवसात ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात हजेरी लावलेली नाही. शेतकरी कांदा साठा करण्यावर भर देत आहेत.
मास्कला मागणी
नंदुरबार : शहरातील विविध भागातील मेडिकल व किरकोळ विक्रेत्यांकडून मास्कची खरेदी वाढली आहे. नागरिक एन-९५ तसेच दोन पदरी मास्कला पसंती देत आहेत. शहरात मेडिकल दुकानांसोबतच काही विक्रेते छोटे स्टाॅल लावून मास्कची विक्री करत आहेत.