मागील वर्षी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून दवंडी देण्यात येत होती. त्यामध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गरज असेल तेव्हाच घराबाहेर निघणे याबाबत जनजागृती करण्यात येत होती. मात्र, आता मागील वर्षापेक्षा चारपटीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागात मास्क न वापराता व विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्या गावातील ग्रामस्थांचे तापाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये काही लक्षणे आढळल्यास स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना स्वॅब देण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. मागील वर्षी ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत होते त्या गावांमध्ये प्रशासनातर्फे काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येत होते. मात्र, आता रुग्णांची संख्या जास्त असली तरी लॉकडाऊनसदृश स्थिती कोणत्याही गावात दिसून येत नाही. म्हणून ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोना आजाराविषयी लोकांमध्ये स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून जनजागृतीची गरज आहे. जेणेकरून या संसर्गजन्य आजाराचे रूपांतर महामारीमध्ये होणार नाही.
ग्रामीण भागात कोरोनाविषयी जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST