आवक घटली
नंदुरबार : बाजार समितीत भाजीपाला आवक दिवसेंदिवस घटत आहे. ग्रामीण भागात भाजीपाला लागवडीचा हंगाम अद्याप सुरु झालेला नाही. यापूर्वी लागवड केलेला भाजीपाला संपुष्टात आला आहे. यामुळे बाजारातील आवकवर परिणाम झाला आहे. बाजारात सध्या उन्हाळी भाज्यांची आवक होत आहे.
कोरोना संसर्गाच्या भीतीने गर्दी झाली कमी
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अद्याप नियंत्रणात आहे. प्रशासनाकडूनही योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रात्रीची संचारबंदी सुरु केली आहे. यामुळे धडगाव शहरातील गर्दीवर परिणाम झाला असून, दुपारी दोन वाजल्यापासून बाजारपेठेत शुकशुकाट होत असल्याचे दिसून आले आहे.
आकडीमुक्त वीज वाहिन्यांमुळे समाधान
बोरद : तळोदा तालुक्यातील विविध भागात आकडीमुक्त वीज वाहिन्या करण्यासाठी कंपनीकडून बंच केबल टाकण्यात येत आहे. यामुळे गावे आकडीमुक्त होत आहेत. यातून चांगल्या दाबाने वीज मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
घरकुल लाभार्थींना हप्त्यांची प्रतीक्षा
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समित्यांच्या कार्यालयांतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. यातील काहींनी दुसरा, तर निम्म्यापेक्षा अधिक जणांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही.
ग्रामपंचायतींच्या जोडण्यांवर संक्रांत
नंदुरबार : वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरण कंपनीकडून सध्या कारवाई करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचाही समावेश असून, त्यांच्या पाणी योजनांचे कनेक्शन कट करण्याची कारवाई होणार आहे. काही ठिकाणी कार्यवाही पूर्ण झाली असून, यामुळे त्या-त्या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याची माहिती देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बँकांचे कामकाज सुरु
तळोदा : दोन दिवस संपावर असलेले बँक कर्मचारी बुधवारी बँकांमध्ये परत आले. यानंतर सुरु झालेल्या कामकाजामुळे बँक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी शहरातील सर्वच बँकांमध्ये नागरिकांची पैसे भरणा व काढण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते.
नागरिक त्रस्त
नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात मोकाट श्वानांचा संचार त्रासदायक ठरत आहे. तालुक्यातील मोठ्या व छोट्या गावांसह शहरालगतच्या गावांमध्ये मोकाट श्वान वाढीस लागले आहेत. या श्वानांचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असून, ग्रामपंचायत विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.