लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : १४ वर्षानंतर नवापूर पुन्हा बर्ड फ्ल्यूबाबत हॅाटस्पॅाट ठरू पहातेय. प्रशासनाने अहवाल येण्याचा बाकी असला तरी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्राण्यांमधील संक्रमण व सांसारिक रोग प्रतिबंधक नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये अंतर्गत प्रतिबंधक क्षेत्र घोषीत केले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यात कुकुट पालन केंद्रांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत अलर्ट घोषित केला आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांचे रोग निदानासाठी नमुने औंध जिल्हा पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहे. कुकुटपालन केंद्राच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत सतर्क क्षेत्र म्हणून नवापुर तालुक्यातील करंजी खुर्द, वाकीपाडा, विजापूर, लहान चिंचपाडा, तीन किलोमीटर अंतरावरील गावे तसेच जामतलाव, जामणी, घोडजामणे, कोठडा, काळंबा, मावची फळी, किलवनपाडा पाच किलोमीटर अंतरावरील गावे नांदवण, बेडकीपाडा, बंधारफळी, दहा किलोमीटर अंतरावरील गावे रायंगण रायपुर, बोकळझर, पायरविहिर,गडद, बिलमांजरे, बंधारपाडा, आमपाडा इत्यादी ठिकाणे सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने या क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी प्रशासन आदेश देण्यात आले आहे. आज दिवसभरात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी यांनी पोल्ट्रीत जाऊन तपासणी केली. सदर पोल्ट्री व्यवसायिकांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. भोपालचा अहवाल आल्यावरच...नवापूर तालुक्यात हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने नंदुरबार पशुसंवर्धन विभागांच्या अधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांनी भेट देऊन पोल्ट्री क्षेत्राची पाहणी करून पंचनामे केले. यासंदर्भात नऊ कोंबड्यांचे अहवाल पुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर भोपाल येथे तपासणी केली जाईल त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे ७० डिग्री सेल्सिअस पर्यंत पाच मिनिटापर्यंत अंडे व चिकन शिजवल्यास त्याच्यापासून बर्ड फ्लू होत नाही. अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त आर. बी. पाटील यांनी दिली आहे.
प्रशासनाने अलर्ट झोनमध्ये केलेल्या उपाययोजना प्रभावी क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असून खाजगी वाहने बाहेर लावण्यात येणार आहेत. जीवंत व मृत वन्यपक्षी, कुक्कुटपक्षी, अंडी, कोंबडीखत, पशुखाद्य अनुषंगीक साहित्य व उपकरण आदी वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. पोल्ट्रीमध्ये मालक व कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे, पोल्ट्री वेळोवेळी निर्जंतवणूक करावी. प्रभावीत परिसर दोन टक्के सोडियम हायड्रोक्लोराईट, पोटॅशियम परमॅगनेटद्वारे निर्जंतूक करावे. परिसरातील वन्यपक्षी, कुक्कुटपक्षी संबधीच्या सर्व नोंदी अद्यावत ठेऊन दक्षता घ्यावी.मृत पक्षी, कोंबटी उघड्यावर टाकू नये तसेच त्यांची शास्त्रीय दृष्टीने विल्हेवाट स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी.आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा.
तालुक्यातील पाच पोल्ट्री फार्म मध्ये सामान्य पेक्षा पक्षांचे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. दगवण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. राणीखेत आजाराने देखील कोंबड्यांचा मृत्यू होतो. बर्ड फ्यूल झाल्याची माहिती चुकीची आहे. भोपाल प्रयोग शाळेचा अहवाल आल्यावरच खरे निदान निष्पन्न होऊ शकेल. नवापुर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. रोज कोंबड्याचा मृत्यूचा अहवाल दिला जात आहे.-अरिफ बलेसरिया,अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन,