लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विधी महाविद्यालयातील कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्थेत राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. हे चर्चासत्र राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद बेंगलोर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते.परिषदेचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश प्रमोद तरारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अॅड.राजेंद्र रघुवंशी होते. न्यायाधीश तरारे म्हणाले की, विधी महाविद्यालयांनी मोफत कायदा सल्ला देणे, कायद्याची जागृकता सर्वसामान्यांमध्ये निर्माण करणे ही जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे सांगितले. अॅड.रघुवंशी यांनी यूजीसी तसेच नॅक या संस्थांच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, भारतातील उच्च शिक्षणाची परिस्थिती, विदेशातील शिक्षण पद्धतीमध्ये असलेल्या तफावतीबद्दल याबाबत माहिती दिली. कायदा शिक्षण देताना प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी पार पाडणेसंदर्भात जाणीव करून दिली.चर्चासत्रात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यातून प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. १२५ सदस्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. विधी विभागाचे अधिष्ठाता डॉ.बी.वाय. रेड्डी, प्राचार्य डॉ.शहनाज बिल्लिमोरिया, प्राचार्य डॉ.पायल पारेख, प्राचार्य डॉ.व्ही.वाय. बहिरम यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव यांनी उच्च शिक्षणाचा दर्जा टिकवणेसंदर्भात राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेची भूमिका स्पष्ट केली. अनेक प्राध्यापकांनी संशोधन पेपर सादर केले. प्राध्यापकांनी सादर केलेले संशोधन पेपर हे पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध केले जाणार आहे. चर्चासत्राच्या आयोजनात प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी, समन्वयक डॉ.एस.एस. हासानी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विधी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:46 IST