लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वप्रथम उभारण्यात आलेला हवेतील ऑक्सिजन प्रकल्प आणखी एका कारणासाठी चर्चेत आला आहेे. या प्रकल्पातून रुग्णालयातील बेडपर्यंत करण्यात आलेली ऑक्सिजन पुरवठ्याची सिस्टीम ही दूरदृष्टी व तंत्रशुद्ध पद्धतीने राबविण्यात आल्याने त्यातून नाशिकसारख्या घटना घडू शकत नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय ऑक्सिजन बचतीचाही उपाययोजना असल्याने राज्यात हा प्रकल्प आदर्श ठरणार आहे.
गेल्या आठवड्यातच नाशिकला ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहिनीतील लिकेजमुळे तेथील रुग्णालयातील २४ जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना ज्या कारणाने घडली तो दोष नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने प्रकल्प उभारणी करतानाच लक्षात घेतला असून, त्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन बेडपयर्यंत पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या तंत्रानुसार ऑक्सिजन साठ्यातून पुरवठा करणारी जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्याला रुग्णालयातील बेडपयर्यंत पोहोचविण्याच्या आधी पुन्हा जंबो सिलिंडरची जोडणी केली आहे. १० जंबो सिलिंडर तेथे जोडले असून, त्याला स्वीच बसविला आहे. जर पहिली वाहिनी लिकेज झाली तर स्वीच बदलून तत्काळ जंबो सिलिंडरच्या साठ्यातून रुग्णांना किमान दीड ते दोन तास ऑक्सिजन पुरवठा होऊ शकेल अशीही सुविधा आहे. याशिवाय ऑक्सिजन बेड असलेल्या रुग्णालयाजवळच जंबो सिलिंडरची व्यवस्था असून, तेथूनही थेट रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करता येऊ शकते.
ऑक्सिजन सिस्टरची संकल्पना
जिल्हा रुग्णालयाने रुग्णांना योग्य पद्धतीने ऑक्सिजन मिळत आहे की नाही ते तपासण्यासाठी स्वतंत्र ऑक्सिजन सिस्टरची संकल्पना राबविली आहे. त्यासाठी २० परिचारिकांना प्रशिक्षणही दिले आहे. रुग्णांना जर आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवठा होत असेल तर त्याचे नियंत्रण ठेवले जाते. त्यातून ऑक्सिजन बचतीची संकल्पना राबविली जात आहे.
राज्य शासनाचे आदेश
राज्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्याने आवश्यकतेनुसार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने आदेशही काढले आहेत. या आदेशानुसार जिल्हा नियोजन निधी, राज्य आपत्ती निवारण निधी व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून हा प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात राबवायचा आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. राज्यात नंदुरबारसह नांदेड आणि कोल्हापूरमध्ये असे प्रकल्प राबविले असून, त्या धर्तीवर प्रकल्प राबविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
कोट...
नंदुरबारला सुरुवातीला लिक्विड प्रकल्पाचा प्रस्ताव होता; परंतु त्यासाठी लागणारा कच्चामाल रत्नागिरीहून आणावा लागणार होता. त्यावर अवलंबून न राहता स्वत:चा प्रकल्प असावा यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून तो राबविला. हा प्रकल्प करीत असताना सर्व प्रकारचा तांत्रिक बाबी व येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याची यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पामुळे नाशिकसारखी दुर्घटना घडणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे.
-डाॅ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.