लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात सर्वप्रथम नंंदुरबार जिल्ह्याला यश येत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरापासून पॅाझिटिव्हिटी रेट राज्यात नंदुरबार जिल्ह्याचा सर्वात कमी असून रोजची रुग्णसंख्याही आता दोन आकड्यांवर आली आहे.
मार्च व एप्रिल महिन्यांत राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा कहर झाला होता. जिल्ह्यातील चित्र पाहिल्यास रोज हजारांवर रुग्ण आढळून येत असल्याने उपचारासाठी रुग्णांना बेड मिळत नव्हते. राज्यातील चित्र तर अधिकच गंभीर होते. या काळात नंदुरबार जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा राज्यातच नव्हे तर देशात गवगवा झाला.
विशेषत: जिल्हा प्रशासनाने तयार केेलेल्या डॅशबोर्ड आणि ऑक्सिजन प्रकल्पांचीही खूप चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्रही दुसरीकडे दिसून येत आहे.
सद्य:स्थितीत राज्यातील २२ पेक्षा अधिक जिल्ह्यांत पॅाझिटिव्हिटी रेट दहापेक्षा जास्त आहे. जालना, सातारा या जिल्ह्यांचा रेट ३० पेक्षा अधिक, तर इतर सहा जिल्ह्यांचा पॅाझिटिव्हिटी रेट २० पेक्षा अधिक आहे. अशा स्थितीत नंदुरबार जिल्ह्याचा पॅाझिटिव्हिटी रेट हा तीन ते चारच्या दरम्यान आहे.