अक्कलकुवा शहरालगत गुजरात हद्दीतील गंगथा येथील रहिवासी व सातपुड्यातील मशरूम शेतीचे प्रणेते राजेंद्र वसावे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन, मशरूम शेतीपासून तयार केलेले मशरूम पावडर, मशरूम पापड, नानखटाई भेट दिली. यावेळी डॉ. भारुड यांनी नानकटाईची चव चाखून जिल्ह्यात मशरूम शेतीच्या माध्यमातून सातपुड्यातील युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेंद्र वसावे यांचे कौतुक केले. मशरूमपासून निर्मित केलेल्या उत्पादनांना योग्य पद्धतीने सादर केल्यास त्यांची मागणी वाढेल, असा विश्वास डाॅ. भारुड यांनी यादरम्यान व्यक्त केला.
प्रसंगी चित्रकार दारासिंग वळवी, भारतीय किसान सेनेचे महासचिव पंडित तडवी, कांतीलाल जाधव,लीलाबाई वसावे उपस्थित होते.
बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. दरम्यान २०१५-१६ साली सुरत येथे मशरूम शेतीच्या एका कार्यशाळेत सहभागी झालो याठिकाणी मशरूम शेती व सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळाल्याने या व्यवसायाकडे वळून आदिवासी युवकांनाीही त्यात समाविष्ट करुन घेत आहे.
मशरूम शेती कायमस्वरुपी घरच्या घरी करता येते. फक्त उन्हाळयात दोन ते तीन महीने तापमान नियमित करावे लागते. मशरूम तयार करण्यासाठी नैसर्गिक किंवा रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेला भात, गहु ,मकाई,ज्वारी,लाकडाचा भुसा वापरावा लागतो. तो भुसा बेड मध्ये निर्जंतुकीकरण करून चार ते पाच तास निचरा करण्यासाठी ठेवावा लागतो.बॅग पॅक करताना मशरूम चे बियाणे बेड भरताना आपल्या हातात ग्लोज घातलेले पाहिजे. ज्यांच्याकडे जमिनी आहे, पण पाण्याची सुविधा नाही किंवा भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी मशरूम शेती चांगला रोजगार देणारी आहे. कारण शरीरासाठी पौष्टिक असलेल्या मशरूमची प्रति किलो हजार ते बाराशे रुपये दराने विक्री होऊ शकते, अशी माहिती राजेंद्र वसावे यांनी दिली.