कोळदा ते खेतिया रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने स्थानिक गावकरी व वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. धुळीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संबंधित ठेकेदार आणि रस्त्यावर होणाऱ्या अवजड वाहतुकीचा विचार करता अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. शिवाय ज्या भागात धूळ उडते त्याठिकाणी निदान दिवसातून दोनवेळा तरी पाणी टाकणे आवश्यक आहे. या रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असल्याने धूळ मोठ्या प्रमाणावर उडते. शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसत असल्याने पिके खराब होत आहेत. आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येत आहे. त्यातच धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पीक खराब होत असल्याने शेतकरी पुरता चिंताग्रस्त झाला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभाग व ठेकेदाराला सूचना करून तत्काळ रस्ता करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याचे अतिशय संथगतीने काम चालू आहे. कित्येक दिवस काम बंद असते आणि त्याचा परिणाम लोकांना सहन करावा लागतो. किरकोळ म्हणजे कमीत कमी दीड-दोन किलोमीटरचा रस्ता करणे बाकी आहे. पण तेवढ्यासाठी कोकम माता मंदिरापासून तर करजईच्या गावाच्या हद्दीपर्यंत दोन भागात काम बाकी आहे. रस्त्यावर वाहन चालवताना अतिशय हाल सहन करून वाहन चालवावे लागते. वाहनधारक खूप त्रस्त झाले आहेत. यात कित्येक मोटारसायकलस्वारांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. याचा रस्ते बांधकाम ठेकेदारावर कुठलाच परिणाम होत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.