लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, उपाध्यक्षांच्या दालनाची भिंत तोडल्याच्या मुद्दयावर मुख्य कार्यकारी अधिकारी आजच्या सभेत उत्तर देणार होते. परंतु ते अनुपस्थित राहिल्याने भाजपच्या दोन सदस्यांनी सीईओ हाय...हाय... च्या घोषणा देत सभागृहाबाहेर पडणे पसंत केले.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष राम रघुवंशी, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ उपस्थित होते. पहिलीच सर्वसाधारण सभा असल्यामुळे विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु बुधवारी सायंकाळी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बैठकीत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतला गेला नाही. परंतु अपेक्षेप्रमाणे भिंतीचा मुद्दा उपस्थित करून भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.सभेचे कामकाज सुरू होताच भाजपच्या सदस्या व या प्रकरणी तक्रार दाखल केलेल्या अर्चना गावीत व राजश्री गावीत यांनी उपाध्यक्षांच्या दालनाची भिंत पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला. आजच्या सभेत सीईओ विनय गौडा यांनी याबाबत सविस्तर माहिती व चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु स्वत: सीईओच गैरहजर असल्यामुळे संतप्त झालेल्या गावीत भगिनींनी हा मुद्दा आधी चर्चेत घ्यावा अशी मागणी केली. परंतु अध्यक्षा सिमा वळवी यांनी नियमाप्रमाणे आणि विषय सुचीप्रमाणे सभेचे कामकाज होईल.बांधकाम विभागाचा विषय आल्यावर आपण प्रश्न उपस्थित करावा असे सांगितले. परंतु अर्चना व राजश्री गावीत या ऐकण्यास तयार नव्हत्या. सीईओंनी उपस्थित व्हावे व माहिती द्यावी अशी मागणी केली. तरीही सभेचे कामकाज नियमाप्रमाणे सुरूच राहिल्याने संतापलेल्या अर्चना गावीत यांनी सीईओ हाय हाय च्या घोषणा देत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. त्यांच्या मागे राजेश्री गावीत देखील निघाल्या.त्यानंतर सभेचे कामकाज सुरळीत झाले. यावेळी भरत गावीत, सुहास नाईक, रवींद्र पाडवी, अजीत नाईक, राया मावची, भूषण कामे यांनी प्रश्न उपस्थित केले.निरंतर शिक्षणाधिकारी गायबनिरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कधीही जिल्ह्यात येत नाही, बैठकांना उपस्थित राहत नाहीत याबाबत सुहास नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. शिक्षणाधिकारी रोकडे यांनी हे पद नंदुरबार व धुळे संयुक्त आहे. त्यांना बैठकांबाबत कळविण्यात येते, परंतु ते येत नसल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्षांनी संबधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सुचना दिल्या.प्रशिक्षण पथकावर कब्जाआरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण पथकावर गेल्या नऊ वर्षांपासून एकाच अधिकाºयाचा कब्जा आहे. त्यांची वैद्यकीय पात्रता नसतांना व त्यांची नियुक्ती नसतांना त्यांना तेथे पदभार देण्यात आला आहे. वास्तविक तीन वर्षांपूर्वी डॉ.संजय वळवी यांना नियुक्ती दिली असतांना त्यांना पदभार दिला जात नाही. याची चौकशी करण्याची मागणी यावेळी भरत गावीत, अजीत नाईक यांनी केली. त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अध्यक्षांनी सुचविले.इतर होळींनाही निधी द्याकाठीच्या राजवाडी होळीप्रमाणेच सातपुड्यातील इतर गावांना होणाºया होळींचा मान देखील मोठा आहे. त्यामुळे काठीच्या होळीला जसा निधी दिला जातो तसा इतर होळींनाही दिला जावा अशी मागणी करण्यात आली. परंतु सध्या आचारसंहिता असल्यामुळे तसा निर्णय घेता येणार नाही, पुढील बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पराडके यांनी व्यक्त केली. अनेक सदस्यांनी त्यांच्या या मागणीला पाठींबा दिला.बैठकीला सभापती अभिजीत पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे यांच्यासह सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.
सभेचे कामकाज कसे चालवावे, कुठले मुद्दे कधी उपस्थित करावे, योजनांचा निधी कसा आणि कुठे खर्च करावा, जिल्हा परिषदेचे अधिकार काय? यासह इतर माहिती व्हावी यासाठी निवडून आलेल्या सर्वच ५६ सदस्यांना प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत माणिकराव गावीत यांनी सांगितले. सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना भरत गावीत यांनी खंत व्यक्त केली. अनेक सदस्य नवीन आहेत. त्यांना माहिती व्हावी यासाठी यशदाने स्थानिक ठिकाणीच प्रशिक्षण घ्यावे म्हणजे सभा चालवितांना व एकुणच जिल्हा परिषदेत कामकाज करतांना गैरसमज होणार नाहीत आणि अडचणी येणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत सर्वच पक्षाचे सदस्य सत्ताधारी आहेत. त्यामुळे सर्वांनी मिळून, मिसळून व सामंजस्याने सभागृह चालवावे असे आवाहन बांधकाम सभापती अभिजीत पाटील यांनी सभागृहात केले. विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, वैचारिक मतभेद ठेवा, पण मनभेद नको असेही ते म्हणाले.