नंदुरबार : सातपुड्यातील आंब्याला यंदा चांगला मोहर आला आहे. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असून आमचूर उद्योगालाही त्याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या वर्षी लॅाकडाऊनमुळे आमचूर उद्योगाला मोठा फटका बसला होता.
यंदा सातपुड्यातील गावरान आंबा चांगलाच बहरला आहे. आंब्याची झाडे मोहराने बहरली आहेत. मोहराचा सुगंध दऱ्याखोऱ्यात दरवळत आहे. येथे आंब्यापासून पूरक उद्योग म्हणून आमचूर तयार केले जाते. आमचूरची बाजारपेठ सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात लाखोंची उलाढाल आमचूर उद्योगाच्या माध्यमातून होत असते.
गेल्या वर्षी ऐन आंब्याच्या हंगामातच लॅाकडाऊन होते. त्यामुळे आमचूर उद्योगावर त्याचा परिणाम झाला. शिवाय स्थानिक ठिकाणीच आंबा विक्री करावा लागला. त्यामुळे आदिवासी कुटुंबाचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले होते. त्याचा फटका अनेक कुटुंबांना बसला होता.
सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात प्रत्येक कुटुंब तीन महिने याच उद्योगात अडकून राहतात.