लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेले सर्व आदेश ‘जैसे थे’ राहतील असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे़ यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ संचारबंदीच्या कालावधीत ३१ मे मध्यरात्रीपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत़ यातून यापूर्वी काढलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू असतील असे त्यांनी म्हटले आहे़ जिल्ह्यातील शहरी भागामध्ये सध्या सकाळी सात ते दुपारी १२ व सायंकाळी चार ते सायंकाळी सात या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्यात येत आहेत़ यातून नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला असून व्यावसायिकांचे व्यवसाय काही अंशी सुरळीतपणे सुरु झाले आहेत़ लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरी नंदुरबार शहरासह शहादा, नवापुर, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या शहरांमध्ये बाजारपेठा सकाळी आणि सायंकाळी खुलत असल्याने अडचणी कमी झाल्या होत्या़ गेल्या तीन दिवसात कोठेही गर्दी किंवा अनुचित प्रकार घडलेले नसल्याने ३१ मे पर्यंत हे आदेश नियमित करण्यात आले असल्याची माहिती आहे़ग्रामीण भागात यापूर्वी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सूट देण्यात आली असल्याने तेथील अर्थचक्राला बºयापैकी गती आल्याचे चित्र आहे़ नियमांमध्ये शिथिलता दिली गेली असली संचारबंदी असलेल्या वेळेत फिरणाऱ्यांवर पोलीसांकडून कारवाई सुरु आहे़सध्या रमजान महिना सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा अशी मुस्लिम बांधवांची अपेक्षा होती़ जिल्ह्यात नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारात त्यांच्याकडून कपडे व इतर चीजवस्तू खरेदीसाठी भेटी दिल्या जात आहेत़ यातून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये उलाढाल वाढत आहे़
लॉकडाऊन वाढला शिथिलता मात्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:35 IST