या निवडणूक विभाग व निर्वाचक गणात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ४ मार्च २०२१ पासून रद्द करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. या सर्व जागा सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भरणे आवश्यक असल्याने महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील रिक्त ११ पैकी पाच निवडणूक विभाग आणि १४ निर्वाचक गणांपैकी आठ गण महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. निर्वाचक गणापैकी अक्कलकुवा तालुक्यातील एक, शहादा चार आणि नंदुरबार तालुक्यातील तीन निर्वाचक गणातील जागा महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी सकाळी ११ वाजता महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. अंतिम आरक्षण सुधारणा आदेशाच्या स्वरुपात २४ मार्च रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. तालुकास्तरावरील सोडतीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सोडतीवर देखरेख करण्यासाठी एक उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.
सोडतीच्या वेळी अंतर ठेऊन बैठक व्यवस्था, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग व शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्देश दिले आहेत.